vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

आनंदी क्षण कसे जगावेत

चालू घडामोडींचे विश्लेषण



जीवन जगत असताना आपल्याला स्वतःसाठी, कुटुंबासाठी, नातेवाईक ,मित्र परिवार, आणि आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी जगता आलं पाहिजे, आनंद देताही व घेताही आला पाहिजे. आनंदाचे क्षण  सोबतीने साजरे करता आले पाहिजेत. मिळून मिसळून राहता आले पाहिजे. हेही सत्य आहे की,
सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतीलच असेही नाही. कुठेतरी समाधानी असले पाहिजे. सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात सुद्धा
काही गोष्टी मनापासून पोटतिडकीने मांडायच्या असतात , बोलायच्या असतात, काही गोष्टी फक्त मनात ठेवायच्या असतात तर काही गोष्टी प्रत्यक्ष करुन कृतीतून दाखवून द्यायच्या असतात.
कोणतीही गोष्ट मनात तपासून करायची असते व ती  करताना सर्वांची मने जपण्याचा आपण प्रयत्न जरुर केलाच पाहिजे, मात्र सगळ्याची मने आपण जपताना कोणतीही गोष्ट सर्वांच्या मनाप्रमाणे होईल याचीही खात्री नसते.कधी कधी आपण खूप चांगले वागतो पण समोरच्या व्यक्ती आपल्याला समजून घेतीलच  याची शाश्वती नसते, आपल्याला काही वेळेस त्रास होतो , पण तुम्ही आम्ही कोण प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, यांनाही त्रास झालाय , कधीकधी आपण प्रामाणिक काम करतो तरीदेखील त्रास होतो पण  अशावेळी त्रास सहन करत आपल्या कामावर लक्ष देत राहणे केंव्हाही चांगलेच , त्रास देणारांकडे  दुर्लक्ष करणे आणि पुढे जाणे हा एकमेव पर्याय असतो.सर्वांच्या मनाप्रमाणे आपण कधीच असू शकत नाही व तेही आपल्या मताप्रमाणे असतील किंवा आपलेही सर्व योग्य असेलच हेही निश्चितपणे सांगता येत नाही.
म्हणून आपण या जीवनात सर्वांबरोबर चांगलेच वागायचे ठरवायचे  मग समोरची व्यक्ति किंवा समाज कसाही असो !
चांगले वागत राहिलो तर आपोआप लोक जोडले जातात व जीवन आनंदी होते किंबहुना सर्व सुखाची प्राप्ती होते.
विजय पिसाळ नातेपुते.

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

आपले जीवन जगताना !!!




चालू घडामोडींचे विश्लेषण

आपलं जीवन !
आपण आपल्या मनाला काही प्रश्न जरुर विचारलेच पाहिजेत !
आपण माणूस आहोत का ?
आपण आपल्यासाठी जगतो की समाजासाठी जगतो ?
खरंच आपलं आयुष्य हे कशासाठी आहे ?
आपली निर्मिती कशासाठी झाली आहे ?
आपल्या आयुष्याची दिशा काय  ? 
आपण आपल्यासाठी  काही वेळ देतो का ?
आपले खास कोण आहे का ?
आपण आपल्या मनाशी संवाद साधतो का ?
वरील प्रश्न  आपल्याला पडले नाहीत तर ?  मला वाटते आपल्या मनाशी बोलायला कमी पडतो आहोत. वरील प्रश्न 
विचारल्यानंतर क्षणभर शांतपणे एकांतात बसून काही संवाद आपण आपल्याशी करावेत ..आणि मग ..
आपण जन्माला आल्यापासून मृत्यू  येईपर्यंत काय करायचा निर्धार केला आहे व आपली आजवरची वाटचाल काय राहिली आहे.
खरेतर आपण   खूप मेहनत करतो ,खूप मोठी स्वप्न पाहतो , स्वप्नांना साकार  करण्यासाठी शिक्षण घेताना , नोकरी अगर व्यवसाय करताना भयंकर परिश्रम करत असतो . सर्वसाधारण लोकांची जी स्वप्न असतात तीच आपलीही स्वप्न असतात . 
छानसा /छानसी   जोडीदार, आपलं स्वतःचं टुमदार घर , घरात सगळ्या सुख सुविधा बर्यापैकी  चांगला बँक बॅलन्स, समाजात मानसन्मान ,प्रतिष्ठा  आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी करुन ठेवायची धडपड  हो हेच आपण ठरवतो  ना ? मनाशी .. हे एकदम कॉमन आहे.
 आपण आपली  ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या दृष्टीने काम करत असतो , न थकता, न चुकता ,न थांबता आपण परिश्रम करतो , एक एक गोष्ट आपण मिळवत जातो।  किंबहुना ते मला मिळालेच पाहिजे म्हणून कठोर मेहनत करत असतो .
 तारुण्यात असताना आपण शक्यतो मागे वळून पहात नाही, शरीराला नेमकं काय हवंय ? काय नको ? याचाही  विचार आपण  करत नाही ,  घरदार ,गाडी बंगला  ,नोकरचाकर , सगळं ऐश्वर्य प्राप्त करतो .. आणि यासाठी कधी लोण काढून तर कधी हाप्त्यावर  एक एक साहित्य घेतो . पण त्याचा उपभोग घ्यायला घरीच नसतो कारण गाडीचा हप्ता, टिव्हीचा हाप्ता , घराचा हाप्ता ,दवाखाना व मुलांचे  शिक्षण  हे खर्च भागवण्यासाठी आपण अजून पळत असतो . होय मी मध्यमवर्गीय माणसाबद्दल बोलतोय...
 आणि या कामाच्या   धावपळीच्या जीवनात आपले आपल्या  शरीराकडे अनावधानाने किंवा पैशासाठी धावत असल्यामुळे दुर्लक्ष होतेच  यातूनही  . खूप पळून , आपण  बँक बॅलन्स करतोच बचत म्हणा  ! 
 , पण  सोबतीला अनुरुप असलेल्या आपल्यावर जीव लावणाऱ्या जोडीदारासाठी पुरेसा   वेळ देतो का ? , आपले मित्र ,नातेवाईक,  आपले आईवडील, आपली लहान मुले। यांनाही वेळ देतो का ? 
 पैसा जरुर कमावलाच पाहिजे पण आपल्यावर प्रेम करणारी जिवाभावाची नाती महत्वाची नाहीत का ?त्यांनाही वेळ देता आला पाहिजे.  जीवाभाची जी माणसे आहेत त्यांच्या बरोबर मनभरुन  बोलतो का ? 
 वेळ दिला पाहिजे .सुखाचे काही क्षण व्यतीत करता आले पाहिजेत ना ! 
आहो 
जग जिंकायला निघण्या अगोदर आपल्या शरीराची  काळजी, मनाचे समाधान आणि आपली जिवलग नाती जपायला हवीत ना ?  मनाशी कधीतरी संवाद साधायला हवा ना ?
 हे क्षणभंगुर आयुष्य  मनसोक्त जगायला नको का ? सगळा पैसा फक्त निवृत्तीसाठी आणि पुढील पिढ्यांसाठीच कमावला पाहिजे हा नियम आहे का ?  पुढच्या पिढीसाठी जरुर करुया , पण त्यांनाही काहीतरी करायला शिल्लक ठेवले पाहिजे ना ?
आपले जगणे आपण नको का शिकायला ?
जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जगण्यासाठी आपण प्रयत्न नको का करायला !
समुद्राच्या किनार्यावर फिरताना ओंजळभर वाळू हातात घ्यावी आणि ती वाळू आपल्या हातातून हळूहळू निसटत जावी , इतके आपले आयुष्य आपल्या हातातून निसटत असते हे कधी आपण ध्यानात घेणार ?
कदाचित आपल्याला सगळं कळतं पण तरीदेखील आपण आपल्यासाठी कधीच जगत नाही .जगाची चिंता आणि जग काय म्हणेल यातच आपले अनमोल जीवन आपण खर्ची घालतो किंबहुना त्यातच आपला वेळ वाया घालवतो . बरोबर ना ?
 आपण आपल्या मनाशी कधीच आयुष्याची बेरीज किंवा वजाबाकी करत नाही.
 जीवन जगत असताना ,जबाबदारीची ओझी वाहताना , आपल्या शारीरिक व मानसिक गरजा हेही आपण विसरून जातो , धावपळीच्या जीवनात ,कधी आपण चिडचिड करतो कधी आपला पारा चढतो तर कधी आपण तहानभूक विसरून जातो . आणि आपल्या जीवनात जे सुखाचे ,समृद्धीचे ,भरभराटीचे, आनंदाचे, दिवस यावेत हे पाहिलेले असते ते बाजूलाच  रहाते आणि , बी.पी ,शुगर , वात ,पित्त ,स्थूलपणा असे नाना विकार वाढवत जातो , गाडी ,घोडे ,बँक बॅलन्स सगळे असूनसुद्धा मनाचे चैतन्य हरवले जाते आणि छानपैकी कितीही जगायचे म्हटले तरीदेखील पथ्थ पाणी आणि बंधनात आपले स्वपन आपण विसरून जातो . मला वाटते आयुष्य जगताना स्वतःला काही वेळ दिला पाहिजे, बचत करताना जीव मारुन जगण्या ऐवजी आनंदी  जगत  बचत केली पाहिजे.  मेहनतीने ,कष्टाने , पैसा कमावलाच पाहिजे पण तो योग्य वेळी, योग्य ठिकाणी स्वतःसाठी खर्च सुद्धा केला पाहिजे आणि प्रत्येक क्षण आनंदात जगायला शिकले पाहिजे. प्रेमाने माणसे जोडता आली पाहिजेत .मी या पृथ्वीवर कशासाठी आलोय, माझ्याकडून निसर्गाची अपेक्षा काय आहे. मला पाठिमागे काय ठेऊन जायचे आहे व सोबत काय घेऊन जायचे आहे. याचा सखोल विचार करुन साधक बाधक आयुष्य आपण कसे जगू शकतो ,हलकेफुलके  राहून उंच भरारी कशी  घेऊ शकतो  आणि मोठी स्वप्न पाहताना खूप मोठे व्हायचे आहे हे मनाशी ठरवून सुद्धा मी माझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही ना ? मी माझ्यासाठी ईतरांचे नुकसान करतो का ? मी मला हवं ते मिळवताना मी ते आपुलकीने मिळवतो का याचाही विचार मनात आला पाहिजे . क्षणभंगुर आयुष्य पुन्हा नाही ,ते एकदाच आहे छानपैकी जगता आले पाहिजे, श्रीमंत  होताना ईतरांनाचा तळतळाट न घेता सरळमार्गी मी जगलं पाहिजे,  बघा नक्की तुम्हाला जिंकता येईल आणि यशस्वी होता येईल... तुम्हाला काय वाटते ,सुख कशात आहे, नक्की सांगा बरं ! 
 माझे जीवन जगण्याचे प्रयत्न ...
विजय पिसाळ नातेपुते... 9423613449
9665936949

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

आरक्षण तिढा आणि पर्याय !

चालू घडामोडींचे विश्लेषण

आरक्षण ! आरक्षण !! आरक्षण !!!  हा तिढा कायमचा सुटू शकतो !

भारत देशात हजारो जाती आहेत आणि त्यांची घटनेनुसार विभागणी ही , सर्वसाधारण , ओबीसी, एस सी आणि एसटी या चार गटात झाली आहे. हे ध्यानात घेता  या चा गटांची प्रत्येक ,राज्यात स्वतंत्र  जातनिहाय जनगणना का होत नाही ?  
जर जातनिहाय जनगणना झाली तर नियमानुसार सर्व चारही घटकांना लोकसंख्येच्या नियमानुसार  प्रतिनिधित्व देता येईल व   न्याय देणे सुसंगत होईल हे सरकार लक्षात का घेत नाही ?
 ओपन  गटात , ओबीसी गटात,  एससी गटात, व एसटी गटात जातींची संख्या किती याला काय  महत्व आहे ?
 या  चारही गटांची लोकसंख्या  हेच महत्वाचे आहे .  कारण आरक्षण टक्केवारी नुसार दिले जाते.
जर आरक्षण 50% पेक्षा जास्त देता येत नाही .
50% हीच  जर लक्ष्मण रेषा कायम केलीच आहे तर जातनिहाय प्रत्येक राज्यात स्वतंत्र जनगणना करा व चारही गटांची लोकसंख्या निश्चित करा,  अडचण काय आहे?
जर लोकसंख्या निश्चित झाली तर एससी व एसटी यांना  घटनेतील तरतूदी नुसार  त्यांच्या  लोकसंख्येच्या 100% जागा राखीव ठेवता येतील।
 म्हणजे समजा एसी व एसटी यांची लोकसंख्या ही  22.5 %असेल  तर 22.5 % इतक्या जागा राखीव ठेवता येतील आणि उर्वरित 77.5%  मध्ये  ओपन व ओबीसी यांची लोकसंख्या निश्चित करुन  आरक्षित जागा निश्चित करता येतील .  समजा ओबीसीं मधील  एकूण जातींची लोकसंख्या  30%  असेल तर त्यांना 15% जागा राखीव ठेवता येतील  ,समजा ओबीसी सर्व जातींची मिळून  एकूण लोकसंख्या 40 % असेल तर त्यांना   20% राखीव जागा ठेवता येतील, जर ओबीसीं जातींची  लोकसंख्या 60% असेल  तर त्यांना  30% जागा राखीव ठेवता येतील . 
पण महाराष्ट्रात व इतर बर्याच राज्यात सुध्दा  कोणतीही जनगणना  झाली नाही आणि आरक्षण मात्र विविध जातींना  दिले गेले आहे .विशेष म्हणजे बर्याच जातींना कोणताही मागासवर्ग आयोग गठित न करता आरक्षण दिले गेले आहे . संबंधित जातींचे मागासलेपण सिध्द न करता आरक्षण वाटले आहे . हा ओपन जातीतील लोकांवर अन्याय नाही का ?  कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही पण नियम आणि कायदे सर्व जाती घटकांना समान अाहेत ,म्हणून घटनेतील तरतूदी नुसार व कोर्टाने जे सांगितले आहे त्या नुसार लोकसंख्येच्या 50%  आरक्षण दिले पाहिजे. आणि मागासलेपण सिध्द करुनच ते दिले पाहिजे. 
पण यावर  महाराष्ट्रातील कोणताही राजकीय नेता ,सत्ताधारी किंवा विरोधक  आणि ओपन समाजातील प्रत्येक जातींचे नेते जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हे ठामपणे का बोलत नाहीत. जातनिहाय जनगणना झाली तर आणि तरच आरक्षित वर्गांची लोकसंख्या निश्चित होईल आणि त्यांना त्यांचा घटनेनुसार वाटा निश्चित करुन  ,सर्व गटांच्या लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार त्यांच्या सामाजिक कल्याणाच्या योजना , निधीची तरतूद  व आरक्षणाची टक्केवारी निश्चित करता येईल. 
म्हणून सर्वच लोकांनी सरकार कडे जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरावा आणि सरकारवर या साठीच प्रेशर आणावा तरच आरक्षणाचे प्रश्न निकाली निघतील अन्यथा हे भिजत घोंगडे कायम त्रासदायक ठरणार व पुन्हा पुन्हा आंदोलने होत राहणार.
विजय पिसाळ .नातेपुते.

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

काय ती झाडी ! काय ते डोंगर !!!

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव !!


चालू घडामोडींचे विश्लेषण


*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव !*
भारताला स्वातंत्र्य मिळून येत्या 15 ऑगस्टला 75 वर्ष होत आहेत . 

*महात्मा गांधींजींच्या आंदोलनाने, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांच्या बलिदानाने , सुभाषचंद्र बोस,  यांच्या जहाल विचारांनी आणि हजारो भारतीयांच्या बलिदानाने  आपल्या भारताच्या  स्वातंत्र्याची मशाल पेटली* लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी हा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास फार मोठा आहे . तत्कालीन काँग्रेसने व काँग्रेसच्या नेतृत्वाने  अहिंसेच्या मार्गाने जी चळवळ उभारली ती चळवळ जगाच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे.
 लाखो भारतीयांनी गांधीजींच्या नेतृत्वात इंग्रज सरकार विरुद्ध   असहकार  ,भारत छोडो , परदेशी मालावर बहिष्कार  चलेजाव  अशा विविध आंदोलनात भाग घेऊन इंग्रज सरकार विरुद्ध रणसिंग फुंकले . 
इथल्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी जुलमी  इंग्रज सरकारचा लाठीमार सहन केला, कित्येकांना तुरुंगवास भोगावा लागला , मागे वळून पाहताना आपल्याला फक्त सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली हे माहित आहे पण त्या बरोबरच हजारो भारतीयांनी  काळ्या पाण्याची शिक्षा भोगली हे आंदमानातील सेल्युलर जेलच्या दप्तरात निश्चितपणे पहायला मिळते , कित्येकांनी  हालअपेष्टा सहन केल्या जणू घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिले , 
इंग्रज सरकारचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेल्या शेकडो नागरिकांवर 
जालियनवाला बागेत जनरल डायरने केलेल्या गोळीबार केला व  शेकडो निरापराध भारतीयांना भारतमातेसाठी प्राणांची आहुती द्यावी लागली .  हे आपण इतिहासात वाचले आहे , जुलमी इंग्रज सरकारने तेंव्हा  मिठावर  सुद्धा कर लावला  गरिबांना मीठही  खायला  महाग घ्यावे लागेल म्हणून मिठावरील कर रद्द करण्यासाठी महात्मा गांधी यांनी पोरबंदर ते दांडी यात्रा काढली  आणि मुठभर मीठ उचलून इंग्रजी सत्तेचा पाया कमकुवत करुन  टाकला .   हे अहिंसेचे यश आहे.  कित्येक लोकांना सावरकरांनी सुटकेसाठी लिहलेली  माफी पत्रे  पटत नाहीत पण जुलमी  इंग्रज सरकार विरुद्धचा लढा बुद्धीच्या बळावर दिला पाहिजे कारण आपण तुरुंगात खितपत पडून स्वातंत्र्य चळवळ पुढे कशी जाणार हाही विचार असला पाहिजे,    भारतीयांनी
स्वातंत्र्याचा लढा सर्व ,जाती,धर्मातील, लोकांनी  एकजुटीने  लढला आणि भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले . स्वातंत्र्य   फुकट मिळाले नाही !
 म्हणून स्वातंत्र्य कसे मिळाले याची आपण पुर्णपणे उजळणी केल्या शिवाय ,स्वातंत्र्याचे महत्व आपल्याला समजत नाही किंवा पारतंत्र्य काय होते हेही लक्षात येत नाही. स्वातंत्र्य समर इतके मोठे आहे की हजारो पाने लिहिली तरीदेखील कमी पडतील .
15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले पण भारताने कोणत्या दिशेने जायचे आहे हे ठरवले  नव्हते कारण स्वातंत्र्य मिळत असतानाच इंग्रजांनी फोडा व राज्य करा नीतीचा अवलंब केल्याने  अखंड भारताती फाळणी  होऊन व धर्माच्या अधारावर पाकिस्तानाची निर्मिती झाली पण महात्मा गांधी , पंडित नेहरू यांच्यामुळे भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनला ,इथे हिंदु ,मुस्लिम, शिख ,इसाई ,बौद्ध असे सगळे जण आपण भारतीय म्हणून स्वतंत्र भारतात गुण्या गोविंदाने एकत्र नांदु लागलो.
म्हणून तर आपल्या भारताला आपण।  "सारे जहाँ से अच्छा हिंदोस्था   हमारा "    असे म्हणतो .
15 ऑगस्ट 1947 पर्यंत इंग्रजांनी भारताची पुर्णपणे लुट केली होती ,  भारत हा केवळ  इंग्रजांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला देश होता .
 इंग्रजाच्या लुटीमुळे  आपला देश तेंव्हा खूप मागे  पडला होता .   भारताला 1947 नंतर शुन्यातून नव्याने सुरवात करावी लागली .
पण भारताने
स्वातंत्र्या नंतर आपल्या प्रगतीची हळूहळू सुरुवात केली , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1949 ला मजबूत संविधान दिले , कार्यकारी मंडळ ,कायदेमंडळ, न्यायपालिका आणि स्वतंत्र निवडनुक आयोग या स्वतंत्र संविधानिक यंत्रणा   मिळाल्या व भारताची लोकशाही मजबूत होऊ लागली. भारताने 1947 ते 2022 या 75 वर्षात शुन्यातून जणू  विश्व निर्माण केले ,इस्त्रो , भाभा अणुशक्ती केंद्र, एम्स ,अशा जागतिक दर्जाच्या संस्था निर्माण केल्या ,  संशोधन केंद्र उभारली  शेकडो किलोमीटरचे रस्ते , संपूर्ण देशात वीज , पाणी  रस्ते या गरजा पुर्ण करतानाच शिक्षणाची  व्यवस्था केली ,  जल विद्यूत केंद्र, औष्णिक विद्युत केंद्र, शेकडो रेल्वे स्टेशन आणि भारतभर रेल्वेचे जाळे निर्माण केले ,  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळांची निर्मिती केली , शेकडो धरणांची उभारणी केली व त्या  माध्यमातून शेतीला व शहरांना पाणीपुरवठा होऊ  ,माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वर्गीय राजीव गांधी यांनी यांनी योग्य पावले उचलल्यामुळे संगणकीय तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताची जगात  ओळख निर्माण  झाली, माहिती व तंत्रज्ञान यात परिपूर्ण कौशल्य मिळवलेले मनुष्यबळ  संपूर्ण जगाला  पुरवण्याचे काम आपला देश करत आहे.  आपल्या देशाने हरितक्रांती केली व  आपल्या शेतकऱ्यांनी आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला .
आपल्या देशाची अन्नधान्याची  गरज भागून कोठ्यावधी डॉलरची  अन्नधान्य, फळे ,भाजीपाला निर्यात आपण करत आहोत. 
भारतातील अभियंते ,डॉक्टर, यांनी जागतिक स्थरावर आपल्या कामाचा  ठसा उमटवला आहे. इथल्या उद्योगपतींनी  व व्यापाऱ्यांनी देशाच्या प्रगतीला फार मोठा हातभार लावला आहे. 1947 पासून ते आत्तापर्यंतच्या सर्व  पंतप्रधानांचे ,राष्ट्रपतींचे व प्रत्येक राज्यातील सरकारांचे भारताच्या प्रगतीत खूप मोठे योगदान लाभले आहे. प्रत्येक सरकाने  एक एक वीट रचली व त्याला जनतेने साथ दिली  म्हणून  भारत राष्ट्राची मजबूत इमारत उभी राहिली .  भारत हा संशोधनात पुढे गेला आणि शस्त्र सज्ज राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे. आपण यशस्वी अणुचाचणी करुन जगातील मोजक्या देशाच्या पंक्तित स्थान मिळवले आहे.
स्वातंत्र्या  नंतरच्या या 75 वर्षात भारताने चौफेर प्रगती साधली आहे .भारत प्रत्येक क्षेत्रात आज पुढे जाताना पाहून सर्वांना अभिमान वाटतो . माहिती तंत्रज्ञान , खेळ ,मनोरंजन ,शिक्षण ,आरोग्य , शेती सहकार या बाबतीत भारत जगाला मार्गदर्शक ठरलेला आहे.
 भारतीय पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय महिलांनी  सुद्धा या देशाच्या प्रगतीला फार मोठा हातभार लावलेला आहे.  म्हणून तर इथल्या महिला ,परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती  या सर्वोच्च पदावर बसल्या !
 काश्मीर ते कन्याकुमारी ,  मुंबई ते कलकत्ता  हिमालय ते सह्याद्री ,  अशा आपल्या महाकाय देशात  विभिन्न चालीरीती , विभिन्न भाषा , विभिन्न संस्कृतीचे लोक एकत्र   राहतात व भारतीय म्हणून सगळे एकसंघ असतात .  प्लेगची साथ असो की पोलिओ निर्म्युलन असो ,कुपोषणाचा विषय  असो  की ,अलिकडच्या काळातील कोरोना महामारीचा विषय असो  आपण सगळ्यांनी प्रत्येक संकटांचा मुकाबला एकजुटीने केला आहे .   
देशावर वेळोवेळी येणाऱ्या संकटात आपले सैनिक, पोलिस, शास्त्रज्ञ ,  डॉक्टर , इंजिनिअर आपला जीव धोक्यात घालून काम करतात आणि त्यामुळे आपल्या एकजुटीने प्रत्येक राष्ट्रीय संकटावर आपण मात करतो . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे तरीदेखील आपल्या पुढे काही आव्हाने सुद्धा  निश्चितपणे आहेत , आजही खूप मोठी जनता दारिद्र्यात जीवन जगत आहे ,वाढती लोकसंख्या यामुळे शहरावर भयंकर ताण पडत असून झोपडपट्ट्यांची स्थिती भयंकर आहे ,कित्येक मुला मुलींना आजही खराब रस्त्यांनी ,डोंगर दर्यातून    पायी चालत शाळेपर्यंत जावे लागत आहे . तरुणांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. राजकीय नेते खोटी अश्वासने देऊन दिशाभूल करत असतात, आरक्षणाचे विषय नीट हाताळता आले नाहीत , जातनिहाय जनगणना नाही त्यामुळे , प्रत्येकाला न्याय  वाटा किती मिळाला पाहिजे हे समजत नाही .भ्रष्टाचार कमी होत नाही.   देश पोखरला जात आहे , गरिब व  श्रीमंत यात दरी वाढत आहे . काळ बदलला मात्र जाती धर्माच्या भिंती उलट गडद होत आहेत .  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच  आपले शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत , यावर योग्य धोरणांची  ठोस कृतीची गरज आहे. सगळ्यांना सगळ्या क्षेत्रात  समान संधी  मिळत नाही. पर्यावरणाचा गजर आपण करतो पण सरकार कडक पावले उचलत नाही व 
 आपणही  भारताचे सजग नागरिक म्हणून प्लास्टिक बंदी स्वतःपासून करत नाही . प्रचंड वृक्षतोड होत आहे मात्र वृक्षसंवर्धन पाहिजे तेवढे होत नाही. स्वच्छता ,
कचरा व सांडपाणी यावर   आपल्याला भरपूर काम करावे लागेल .
खडोपाडी ,झोपडपट्टी परिसरात उघड्यावर शौचाला जाणारांची आजही लक्षणीय संख्या आहे. यापुढच्या काळात आपण सर्वांनी  यावरही सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल . आरोग्य दक्ष , व्यावसाय शिक्षण , सार्वजनिक स्वच्छता व स्वयंशिस्त यातून पुढची पिढी घडवावी लागेल . 

"जहाँ  डाल डाल पर सोने कि चिढिया करतीथी बसेरा, ओ भारत देश था मेरा"

असा भारत आपण सर्वांनी मिळून परत एकदा घडवायचा आहे .
चला चर मग स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुया आणि सशक्त भारताला बलशाली बनवूया  !
वंदे मातरम् ! भारत माता की जय !
जय जवान ! जय किसान !! जय विज्ञान !
धन्यवाद !©® विजय पिसाळ नातेपुते !

सोमवार, २५ जुलै, २०२२

मुले जेंव्हा मोठी होतात

चालू घडामोडींचे विश्लेषण


मुलं जेंव्हा मोठी होतात !
मुलगा असो की मुलगी जेंव्हा मुलं  मोठी होऊ लागतात ,तसे प्रत्येक आई वडिलांना त्यांच्या उच्च शिक्षणाची ,भविष्याची ,करिअरची  काळजी वाटायला लागते. मुलं अभ्यासू असतील ,मेहनती असतील तर आई वडिलांना खूप समाधान वाटते ,  आणि मुलांसाठी  कितीही त्रास सहन  करायची तयारी आईवडीलांची असते ,  मुलांसाठी प्रत्येक  आईवडील धडपड करतात , गरिबातील गरिब आईवडील सुद्धा आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार होतात. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, आणि आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला धडपड करावी लागते. मग उच्च शिक्षण असो की व्यावसाय असो ! या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांनी उंच भरारी घ्यावी ,आपले नाव उज्वल करावे यासाठी मुलांचे  आईवडील सगळे प्रयत्न व मेहनत  करत असतात.  मुलांचे यशस्वी जीवन हेच आईवडीलांनी पाहिलेले स्वप्न असते आणि यासाठी  आईवडील हे मेहनत करतात, बचत करतात , प्रसंगी उपाशी सुद्धा राहतात   हे करत असताना  मुलांसाठी  कोणतेही क्षेत्र निवडताना मुलांच्या आवडी निवडी काय आहेत हे पाहतात का ?  त्यांची काय इच्छा आहे हे लक्षात घेतात का ? आपल्या आवडी जशा   महत्वाच्या  असतात  तशा मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत हे पाहतात का ? आपले मत मुलांवर न लादता 
त्यांना ज्या गोष्टीत करिअर करायचे आहे ,त्यासाठी आईवडीलांनी प्रोत्साहन दिले तर त्यांच्या स्वप्नांना बळ मिळते . जवळपास सर्व मुलांची बौध्दिक पातळी असते पण घरातील वातावरण ,आईवडीलांचा मुलांशी होत असलेला संवाद यातूनच मुले घडतात, मुलांशी जर मैत्री केली त्यांना समजून घेतले ,त्यांचा आत्मविश्वास वाढवला ,त्यांच्या पंखाना बळ  दिले तर मुले निश्चितपणे आपले कर्तृत्व सिद्ध करतात,  घरात मुलांशी आईवडीलांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजेत ,आपुलकीने बोलले पाहिजे , तरच मुले दडपण घेत नाहीत, यश मिळवण्यासाठी , फार दडपण देण्याची गरजच नसते फक्त त्यांना अतिउच्च ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असते .
आणि संस्कारात घडलेली मुले आपोआपच आईवडीलांचे नाव मोठे करतातच . मुलं मोठी झाली की त्यांना जे आपण लहानपणी पासून घडवले आहे ,संस्कार दिले आहेत त्याप्रमाणे वागत असतात, मुले मोठी होत असताना जर घरातील वातावरण छान असेल तर त्यांच्या अंगी नम्रता निर्माण होते. अशी मुले ,नोकरी ,व्यवसाय व नागरिक म्हणूनही  यशस्वी होतात. 
मुलांना समजून घ्यावे लागते। त्यांना मानसिक आधार द्यावा लागतो .त्यांचा  मित्र परिवार, त्यांची उठबस, त्यांची विचार पद्धत समजून घ्यावी लागते . 
मुलांकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता त्यांचा कल हेही तपासावे लागते तरच मुलांचे करिअर यशस्वी होते.
मुले मोठी जेंव्हा मोठी होतात तेंव्हा त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्याही मतांचा आदर केला पाहिजे, यश अपयश ,आनंद , दुःख, नैराश्य अशा प्रत्येक वेळी त्यांच्या सोबतीला असले पाहिजे , मुलांचा एखादा निर्णय चुकला तर त्याला नाउमेद न करता नवी दिशा दाखवली पाहिजे, त्यांच्या मनातील भावना समजून घेतल्या पाहिजेत .मुलांना वारंवार चुकांची जाणीव करून देताना त्यांच्या मनात अपराधी भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. मुलांशी कधीही दुरावा निर्माण झाला नाही पाहिजे. मुलांनी कायम आपल्या बरोबर मनमोकळेपणाने बोलले पाहिजे असे वातावरण घरातील असले पाहिजे.  मुलांना प्रोत्साहन देत असतांना, कर्तव्य, जबाबदारी या बाबतीत जरुर अवगत केले पाहिजे पण मुलांवर कधीही आपल्या विचारांचे ओझे देऊ नये.  प्रत्येक आईवडीलांनी मुलांची  सावली बनावे पण इतकीही सावली बनू नये की त्या सावलीत त्याची वाढ खुंटली जाईल.   मुलं मोठी झाली की आपणही ती मोठी झाली आहेत याची जाणीव मनात ठेवली पाहिजे.  आईवडील हे मुलांसाठी पाझरणार्या झर्या सारखे असले पाहिजे , म्हणजे मुलांना माया ,ममता मिळेल व सदैव सोबत राहतील, मुलं मोठी झाली की आपल्या रागावर नियंत्रण हवे , त्यांनाही चांगले वाईट समजते यावर आपला विश्वास हवा  ,  मुलांना मानसिक आधार हवा असतो ,मुलांना शाबासकीची ,कौतुकाची थाप हवी असते , मुलां त्यांच्याशी आदरयुक्त नाते हवे असते . 
याची जाणीव प्रत्येक आईवडीलांनी ठेवली तर मुले घडतात हे नक्की..©®
विजय पिसाळ नातेपुते.
9423613449



बुधवार, ८ जून, २०२२

जायंटस् ग्रुप ऑफ सातारा च्या अध्यक्षपदी श्री . रविराज गायकवाड यांची निवड!

चालू घडामोडींचे विश्लेषण









आमच्या शालेय जिवनातील असंख्य मित्रांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे आणि  त्यापैकीच एक यशस्वी व्यावसायिक. . 
आमचे मित्र मा . श्री रविराज रामराव गायकवाड  यांची  जायंटस् ग्रुप ऑफ सातारा च्या सन २०२२ / २०२३ या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे .  *रविराज तुमचे खूप खूप अभिनंदन* 
रविराज गायकवाड हे आमचे इयत्ता ५ वी ते १० वी  पर्यंतचे शालेय मित्र, रविराज यांनी  अगदी शुन्यातून कष्ट करत शिक्षण घेतले , इंजिनिअरींग नंतर  काही दिवस जॉबही केला पण मुळात काहीतरी करण्याची जिद्द व चिकाटी असल्यामुळे त्यांनी सातारा या ठिकाणी  विविध कंपन्यांचे इन्व्हर्टर  आणि बॅटरीचे होलसेल आणि रिटेलचे दुकान सुरु केले .  प्रामाणिक काम करण्याची सवय आणि लोकांना सेवा देण्याची धडपड व अंगात उपजत कष्टाची तयारी यामुळे  अल्पावधीतच रविराज यांना मोठ्या बँका , पतसंस्था ,  बिल्डर, मोठे काॅन्ट्रॅक्टर यांच्या ऑर्डर मिळाल्या व व्यवसायात भरारी घेतली . सातारा सारख्या शहरात व्यवसायिक   बस्तान तर  बसवलेच पण सामाजिक कार्याची आवड, नेतृत्व करण्याची क्षमता यामुळे ते जायंटस् ग्रुप ऑफ साताराशी जोडले गेले ,  सामाजिक व राजकीय क्षेत्रातील खूप मोठा मित्र परिवार त्यांनी निर्माण केला ,  सातारा जायंटने लोकांसाठी आरोग्य शिबीरे , वृक्षारोपण,  रक्तदान शिबिरे,    पुरग्रस्तांना मदत, आपघात ग्रस्तांना मदत,  विविध व्याख्याने असे विविध उपक्रम राबवले  आणि सर्वसामान्य लोकांना खूप मदत केली . जायंटस् ग्रुप ऑफ सातारा हा प्रतिष्ठित लोकांचा सामाजिक काम करणारा ग्रुप आहे.  तसेतर आम्ही जीवलग मित्र आहोत पण  आमचे दोघांचे  वैचारिक व राजकीय  मतभेद आहेत मात्र  मित्र म्हणून आम्ही खूप जवळचे आहोत आणि वैचारिक आणि राजकीय मतभेद असतानाही आमच्यात कधीही कटुता आली नाही . आम्ही  आपआपल्या मतावर  ठाम राहतो , टोकाचा विरोध करतो पण मैत्रीत कधीच कटुता येऊ देत  नाही कारण आम्ही विचारांनी परिपक्व आहोत. 
रविराज यांची जायंटस् ग्रुप ऑफ साताराचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे कळताच मनाला खूप आनंद झाला  आणि  आपल्या मित्राला नवीन जबाबदारी मिळाली व मित्राच्या सामाजिक कामाचे सार्थक झाले ही भावना ह्रदयात निर्माण झाली .  रविराज यांना पुढील काळात अजून खूप काम करण्याची संधी मिळावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना ! 
विजय पिसाळ नातेपुते.

गुरुवार, १२ मे, २०२२

आत्महत्या ! आत्महत्या ! ! आत्महत्या ! ! !


चालू घडामोडींचे विश्लेषण


आत्महत्या!  आत्महत्या ! !  आत्महत्या ! ! ! 

दुष्काळ पडला काही पिकले नाही ,  आत्महत्या ! 
पुर आला , पिक वाहून गेले , आत्महत्या ! 
पिकाला बाजारभाव भेटला नाही , आत्माराम! 
मुलीचे लग्न जमत नाही , आत्महत्या ! 
कर्ज झाले , आत्महत्या ! 
मुलगी पळून गेली , आत्महत्या ! 
मुलाला नोकरी लागत नाही , आत्महत्या ! 
घरात भांडण झाले , आत्महत्या ! 
 टेन्शन आले , आत्महत्या ! 
सावकार व बँका छळवणूक करतात, आत्महत्या ! 
कोणतीही समस्या निर्माण झाली की आत्महत्या ! 
आत्महत्या हाच एकमेव पर्याय आहे ? 
मान्य आहे . . 
जीवनात संकटे येतात  मनस्ताप होतो , सरकार, प्रशासकीय यंत्रणा खूप  त्रास देतात,  जगणे मुस्किल करतात,  छळवणूक होते , पिळवणूक होते ,  कष्ट करुनही पदरात काहीच पडत नाही ,  कर्ज वाढते ,  समाजातील मानसन्मान जातो ,  अपमान होतो .  परिस्थिती वाईट व विपरीत होते .  जवळचे  सगळे सोडून जातात, समाज दुषणे देतो ,  वाईट परिस्थितीत  मदतीला कुणीही येत नाही .  
पण याला उपाय आत्महत्या आहे का ? 
आम्ही  छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांचा वारसा सांगतो , खरच आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे ,  इतका मोठा आदर्श आपल्या समोर असताना आपण जीवनाला कंटाळतो ! 
 शिवरायांना , शंभुराजांना जीवनात हजारो संकटे आलीच ना !  
 पण ते संकटांना घाबरले का ?  त्यांनी संकटांशी सामना केला ना !   संकटांशी दोन हात केले ना !   शेवटपर्यंत ते लढत राहिले ना !   कुणासाठी प्रजेसाठीच ना ! 
 असली भेकड, नेबळट, घाबरट,   दळभद्री पुढची प्रजा निघेल असे जर तेंव्हा शिवरायांना वाटले असते तर कदाचित शिवरायांनी सुद्धा  स्वराज्याचा संकल्प विचारात घेतला नसता ! 
 लोकांसाठी  शिवरायांनी  स्वतःचा जीव कित्येक वेळा धोक्यात घातला आणि आम्ही  काय आदर्श घेतला ! 
आपण महापुरुषांकडुन आदर्श न  घेता आत्महत्या करतोय किती दुर्दैव आहे 
  षंढ होऊन आत्महत्या करतांना आमच्या मनात , लहान मुले, बायका पोरं , आई वडील यांचा कोणताही विचार का येत नाही . मोगलांच्या , निजामाचा , आदिलशाहाच्या , कुतुबशहाच्या , 
इंग्रजांच्या विरुद्ध आमचे पुर्वज यासाठीच लढले का ? 
लेकांनो प्रसंगी 
व्यवस्था उलथून टाका ,  कुणाचेही पैसे बुडवू नका पण तुमच्याकडे पैसे नसतील व तो भयंकर त्रास देत असेल त्याला  प्रसंगी बडवून काढा . 
पैसा मिळवण्याचे सरळमार्गी खूप मार्ग आहेत, 
वाट्टेल तो कामधंदा करा ,  शेती कोरडवाहू असेल तर  पानटपरी टाका , वडापावची गाडी टाका , पंग्चर दुकान टाका , कोणतेही काम करा , कामाला लाजू नका पण  नालायकांनो आत्महत्या करु नका . . 
किती दिवस आत्महत्या करणार तुम्ही ?  काय आदर्श पुढच्या पिढीला देणार तुम्ही . . 
वारेमाप खर्च करणे , सातत्याने  एक म्हणजे एकच पिक घेणे सोडून द्या !  पिक बदल करा , 
थोडीफार तरकारी करा ,  थोडीफार फळझाडे लावा , त्याची  हातविक्री करा , त्यातून प्रपंच चालवा . . 
लग्न, बारसे , वाढदिवस  छोटे व घरगुती करा . 
कौटुंबिक कार्यक्रम करतांना उधळपट्टी करु नका बचत करा .  व्यसनापासून दुर रहा .  
पण आत्महत्या करु नका . . 
आत्महत्या हा पर्याय नाही . 
कुटूंब रस्तावर येईल असे कृत्य करणे हे नामर्दपणाचे लक्षण आहे.
लेखण प्रपंच. . विजय पिसाळ नातेपुते. . 
९४२३६१३४४९
९६६५९३६९४९



बुधवार, ११ मे, २०२२

डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतो ?

चालू घडामोडींचे विश्लेषण    


भारतीय रुपया दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे. डॉलरविरुद्ध रुपयाची जोरदार घसरगुंडी झाली आहे. एका अमेरिकन डॉलरची किंमत 80 रुपयांना जाऊन टेकेल की  काय अशी भीती आहे.
रुपयाच्या या गरिबीवरून  जोरदार राजकारण सुरु आहे .  पुर्वी मोदींनी मनमोहनसिंग सरकारला रुपयांची किरकोळ घसरण झाली तरी हल्ला  चढवला होता व सध्या विरोधक तेच काम करत आहेत.  मुळात  रुपया नेमका का घसरतोय? आपल्यावर याचे काय परिणाम होतील? हे आपण तपासले पाहिजे .  जेंव्हा मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आपल्या देशात होते , आपले उद्योगधंदे व मार्केट तेजीत असते तेंव्हा  सहाजिकच आपल्या देशाची आर्थिक वाटचाल मजबूत दिशेने चालू असते .  देशाची निर्यात आयातीपेक्षा जास्त होऊन  परकीय गंगाजळी वाढत असते ,  यालाच सोप्पा भाषेत सांगायचे झाले तर आपली बाजारपेठ व लोकांची क्रयशक्ती वाढलेली असते.  आपल्या उद्योगधंद्यातून जास्त नफा होतो व गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो , पण आपली उद्योगधंद्यांची , शेतीची परिस्थिती बिकट झाली तर निर्यात घटते व आयात वाढते आणि परकीय चलणसाठा कमी होतो .  सहाजिकच आर्थिक मंदी यायला सुरवात होते , विदेशी गुंतवणूक करणारे लोक गुंतवणूक काढून घ्यायला सुरवात होते , शेअर बाजरावर त्याचे विपरीत परिणाम होतात व रुपयाचे अवमुल्यन होते. थोडक्यात डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण होते. 
९ तारखेला  बाजार उघडला तेंव्हा रुपयाचा दर प्रत्येक डॉलरमागे 77 रुपये 58 पैसे झाला. आजवरचा हा नीचांक आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने म्हणजे त्यांच्या रिझर्व्ह बँकेने व्याजदर अर्धा टक्क्याने वाढवला आणि डॉलरची किंमत जगातल्या सगळ्याच चलनांच्या तुलनेत वधारली. 
भारताप्रमाणेच टर्की, दक्षिण आफ्रिका यांचीही चलनं गडगडली. भारताच्या तुलनेत त्यांची अर्थव्यवस्था डळमळीत आहे .  पण भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेला सुरुंग का लागावा ? 
कारण भारत सरकारने  असंख्य उद्योगपतींची कर्जे माफ केली  किंवा ति बँकेच्या एनपीए यादीतून काढून टाकली परिणामी  बँकांचे नुकसान झाले . आणि त्याची भरपाई करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी अलिकडच्या काळात सरकारने वापरला  ? 
मुळात 
रुपयाची किंमत बाजारपेठ ठरवते. बाजारातल्या चढ-उतारांवर रुपयाची डॉलरच्या आणि इतर चलनांच्या तुलनेतली किंमत वर-खाली होत असते. याने आपल्याला काय फरक पडतो?
उदा. 
समजा तुम्हाला अमेरिकेतून एक वस्तू विकत घ्यायची आहे, जिची किंमत एक डॉलर आहे व तुमच्याकडे  १२०  रुपये आहेत. डॉलरची किंमत ७८ रुपये असेल तर तुमच्याकडे ४२  रुपये उरतील. पण ती जर डॉलरची किंमत  असती, समजा ६५  रुपये असती तर तुमच्याकडे  ५५ रुपये उरले असते आणि त्यात तुम्ही आणखी काहीतरी विकत घेऊ शकला असतात. आता भारत जेव्हा अमेरिकेतून गोष्टी आयात करेल तेव्हा हेच होईल. आधी करत होतो त्याच आणि तितक्याच वस्तू आयात करण्यासाठी जास्त खर्च येईल.

अर्थविषयक घडामोडींबद्दल  अभ्यास असणारे  अर्थ तज्ज्ञ म्हणतात  "डॉलर महागला की पहिला परिणाम कच्च्या तेलावर होतो. आत्ता आधीच खनिज तेलाच्या किंमती जास्त आहेत, 
त्यात डॉलरही महागलातर  याचा परिणाम आपल्या बॅलन्स ऑफ ट्रेडवर होऊ शकतो आणि करंट अकाउंट डेफिसिट वाढू शकतं. हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही."

"आपण कच्च्या तेलाची आयात डॉलर मोजून  करतो,  जर  आपण कच्चे तेल  रुपयांमध्ये ते विकत घेत असतो तर थोडाफार दिलासा मिळू शकला असता, पण तशी परिस्थिती  नाही.  डॉलर वधारल्याने व सहाजिकच  महागाई वाढल्यामुळे व्यवसायासाठी आयात करणारेही  कचरत आहेत, कारण महाग वस्तू इथे खपवणे कठीण आहे .  या सगळ्याचा थेट ताण आपल्या अर्थव्यवस्थेवर पडतो."
पंतप्रधान मोदींवर या सगळ्यामुळे जोरदार टीका होतेय.  कारण त्यांनी अर्थव्यस्थेकडे गांभीर्याने पाहिलेच नाही .  फुकटच्या योजना ,  सेंट्रल व्हीस्टा सारखे प्रचंड खर्चिक प्रोजेक्ट आणि लाडक्या उद्योगपतींना दिलेले झुकते माफ  याचा परिणाम आपल्या अर्थ व्यवस्थेवर होत आहे . 
रुपयाच्या पडलेल्या किमतीचा भारतीय निर्यातदारांना फायदा होऊ शकेल पण निर्यात वाढीला केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे .  
मागच्या सहा महिन्यांपासून स्टॉक मार्केटमधून विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेतायत. त्यांना परत इथले उद्योधंदे  व शेतातील उत्पन्न  वाढले आणि तरच लोकांची क्रयशक्ती वाढीला लागणार आहे . 
नाहीतर भारतीय रुपयांचे कितीही अवमुल्यन झाले तरीदेखील विदेशी गुंतवणूक फार होईल असे वाटत नाही .  
आधीच महागाईने लोकांचं कंबरडं मोडलंय. घरगुती गॅसच्या किंमती वारंवार वाढत आहेत.  डिझेलने लोकांना शॉक दिलाय, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तू घेणे कठीण झालंय,  कर्जाचे हफ्ते असं सगळं महागत चाललंय पण मोदी सरकार याबद्दल काहीही उपाययोजना  करत नाही  अशी परिस्थिती आहे व विरोधी पक्ष सुद्धा विशेष काही करत नाही . 
डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात जेंव्हा रुपयाची किंमत किरकोळ जरी  घसरत होती तेंव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी युपीए सरकारवर जोरदार टीका केली होती. 'इतर देशांची चलनं घसरत नाहीत मग रुपयाच का घसरतो?', असं मोदींनी या भाषणात म्हटलं होतं. मोदींच्या भाषणातला तोच भाग आता सामान्य नागरिक दाखवत आहेत पण  विरोधी पक्ष पाहिजे तेवढा हल्ला सरकारवर करत नाहीत   फक्त सोशल मिडियात  विचारलं जातंय की मोदी गप्प का आहेत?
युपीए सरकारच्याच काळात लोकसभेत विरोधी पक्ष नेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांनीही रुपयाच्या घसरणीवरून सरकारवर घणाघाती हल्ले  केले होते तेंव्हा  पंतप्रधानांनी उत्तर द्यावं अशीही त्यांनी मागणी केली होती. तो व्हीडिओदेखिल अनेकांनी आता शेअर केला आहे.फक्त पंतप्रधान मोदींनाच नाही, तर सर्व स्तरातील भाजप नेत्यांना विरोधकांनी याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे .  
भारत खुल्या अर्थव्यवस्थेचा भाग  असल्याने कोणत्याच सरकारचं अर्थव्यवस्थेच्या सगळ्या पैलूंवर थेट नियंत्रण नसतं. पण सरकार त्यावर निश्चितपणे उपाययोजना करुन लोकांना दिलासा देऊ शकते . जी 
 बाजारावर  अनेक गोष्टींच  नियंत्रण  असते. जेव्हा परिस्थिती गंभीर होते तेव्हा नियामक यंत्रणा त्यात हस्तक्षेप करत असतात. पण बाजारपेठेची या हस्तक्षेपावर काय प्रतिक्रिया असेल हे त्या त्या वेळीच समजतं. सध्याच्या घडीला तरी रिझर्व्ह बँक यात हस्तक्षेप करेल असं चित्र दिसत नाही . 

विजय पिसाळ नातेपुते



सोमवार, २ मे, २०२२

सव्वीस वर्षांनी एकत्र येत मैत्रिणी रमल्या जुन्या आठवणीत








चालू घडामोडींचे विश्लेषण. . . . . 

सव्वीस वर्षांनी  जीवलग मैत्रिणी रमल्या जुन्या आठवणीत. . 

शाळेतील दिवस होते आनंदाचे ! 
जीवन किती सुंदर ते बालपणीचे ! 
हसने ,  बागडणे , मनमुराद नित्याचे ! 
दंगामस्ती ,  कलकलाट  जणू थवे पाखरांचे ! 
 संस्कार  मनावर रुजले , उपकार त्या गुरुजनांचे ! 

सातारा शहरातील नावाजलेली . 
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची. 
कन्याशाळा, सातारा . 
 या मुलींच्या शाळेतील 
सन १९९५/९६   इयत्ता १० वी या बॅच मधील  विद्यार्थींनीचा स्नेहमेळावा दिनांक १ मे २०२२ रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या शाळेची स्थापना सन १९२२ सालची असून या शाळेचे सन २०२१/२०२२ हे शताब्दी वर्ष सुरू आहे . 
या शाळेत शिकलेल्या  असंख्य मुलींनी , सामाजिक, राजकीय, सहकार,  शिक्षण व क्रिडा आणि आपआपल्या  क्षेत्रात   मोठे नाव कमावलेले आहे.  
स्वातंत्र्यपुर्व  काळात स्त्रियांच्या  शिक्षणाला  पुरुष प्रधान मानसिकतेमुळे विरोध होता अशा काळात मुलींनाही शिक्षण  घेता आले पाहिजे हाच विचार मनात ठेवून या शाळेची स्थापना महर्षी कर्वे  यांनी केली व समाजात पुरुषांच्या बरोबरीने मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले .
या संस्थेची स्थापना  महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यातील हिंगणे या गावी केली होती व संस्थेचे नाव सुद्धा हिंगणे शिक्षण संस्था असे होते .
  या संस्थेने विविध ठिकाणी शाळा व महाविद्यालये काढलेली आहेत. 
हिंगणे संस्थेचे नंतर नामांतर  महर्षी कर्वे असे करण्यात आले .  अशा शिक्षणाचा वारसा लाभलेल्या संस्थेत  १९९५/ ९६  साली इयत्ता १० वी  पुर्ण केलेल्या मुलींचा स्नेहमेळावा संपन्न झाला ,  
दिनांक १ मे रोजी सकाळी  ११ वाजता होणार्‍या स्नेहमेळाव्यासाठी ,  सर्व मैत्रिणी कन्या शाळेत  एकत्र येण्यासाठी आपआपल्या घरून  निघाल्या , कित्येक  मैत्रिणींनी तर खूप लांबचा प्रवास केला आणि या  स्नेहमेळाव्याला उपस्थित राहिल्या  .  १ मे हा दिवस  महाराष्ट्र दीन   व कामगार दीन असतो,
 त्याच बरोबर महाराष्ट्रातील बहुसंख्य शाळांचा  वार्षिक निकाल व गुणपत्रिका वाटपाचाही कार्यक्रम असतो , हा सुवर्ण योग साधून स्नेहमेळावा  १ मे रोजी घेण्याचे निश्चित केले .  

१ मे असल्यामुळे  वातावरण अगदी प्रसन्न होते.    निकालपत्र घेऊन जाण्यासाठी पालकांची व विद्यार्थीनींची गडबड  सुरू होते ,  बहुसंख्य शिक्षकवर्ग  , विद्यार्थी व पालक हे निकालपत्र घेऊन जाण्यासाठी  उपस्थित होते.  
शाळेतील हे आनंदी वातवावरण कित्येक वर्षांनी पहाण्याचा योग आला  . 
  सर्व मुलींनी  आपआपल्या धावपळीच्या जीवतानील  अमूल्य असा वेळ काढून  १ मे च्या   स्नेहमेळाव्यासाठी जणू आपला दिवस राखून ठेवलाय . . आणि नटून थटून आनंदी वातावरणात  स्नेहमेळाव्यासाठी मैत्रिणी जमू लागल्या आहेत हे दृश्य  खूप छान वाटत होते . . 
एक एक मैत्रिणी जमतील तसे  वातावरण खूपच भाऊक होत होते .  सव्वीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर एकत्र  येत असल्यामुळे  सगळ्या मैत्रिणी एकमेकींची गळाभेट घेत होत्या , काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रू आपोआपच येत होते .  आपला वर्ग, आपले वर्ग शिक्षक,  आपले विषय शिक्षक,   शाळेत चालणारे उपक्रम, या आठवणी एकमेकींना सांगताना जनू सगळ्या मैत्रिणीं शालेय जीवनातील भूतकाळात  रमून गेल्या .   पाखरांचा थवा झपकन पिकांवर बसावा तो क्षण आपल्या डोळ्यांनी टिपावा  आणि मन प्रसन्न व्हावे तसे वातावरण पहायला मिळाले . . 
तुझ्या डब्यात किती छान भाजी असायची ,  तुझ्या आईच्या हातचा चिवडा किती मस्त लागायचा , तुझ्या डब्यात तर  काय काय असायचे ,  आपण कसे एकमेकींसोबत डबे खायचो,  हे सर किती छान शिकवायचे , त्या मॅडम किती कडक होत्या ,  तिचे बाबा  किती छान होते ,  चित्रकलेच्या तासाला किती मज्जा यायची ,  आपला वर्ग कसा दंगा करायचा मग आपले सर कसे रागवायचे ही चर्चा  एकदम भुतकाळात घेऊन जात होती ,  शाळेची घंटा वाजावी आणि सर वर्गाच्या बाहेर पडावेत आणि जोरदार हास्य फुलावे तसे आज सर्व मुलींना वाटत होते ,  काहीतरी सांगायचे , भरभरून बोलायचे ही धडपड  सुरु होती ,  प्रत्येकीला वाटायचे किती बोलू आणि काय काय सांगू ,  प्रत्येकीने भूतकाळात जावे आणि आपले अनुभव कथन करावे  आणि सर्वांच्या चेहऱ्यावर कधी हास्य, कधी भाष्य तर कधी , तर कधी कुतुहल फुलावे व  मनमुराद दाद हे आपोआपच व्हायचे ! 
तुझ्यात खूप बदल झालाय। तू आहे तशीच आहे ,  तू जरा स्वतःकडे लक्ष दे ही टिपकल चर्चा मस्त वाटायची क्षणभर  काळजीचे , क्षणभर   आपुलकीचे बोलणे मनापासून आवडत होते .   भूतकाळातील आठवणींचे  क्षण जसे जसे आठवतील तसे  प्रत्येकीचे  मन भरुन यायचे . 
ही  गप्पांची मैफल रंगत असतानाच या मुलींसाठी शाळेने खास नाष्ट्याची व्यवस्था केली होती ,  चविष्ट व रुचकर उडीद वडा आणि इडली सांभर  खावून सर्व मैत्रिणी सुखावल्या . .  अगदी तृप्त झाल्या . . 
तोपर्यंत शाळेतील निकालपत्रांचे वाटप होऊन झाले आणि सगळे शिक्षक व शिक्षिका या स्नेहमेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या  . 
ओ सर, ओ मॅड ओळखले का मला !  
 छान संवाद विद्यार्थीनी व शिक्षक शिक्षिका यांचे होत होते .  थोर ति गुरु शिष्य परंपरा अनुभवता आली .
 भेटीगाठी झाल्या , खुशाली विचारपूस झाली ,  शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थीनी या सर्वांनी   महर्षी कर्वेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .  कृतज्ञतेची भावना जणू  मनात दाटून आली . 
शाळेच्या प्राचार्या श्रीमती  जगताप  मॅडम यांनी शाळेच्या प्रगती बद्दल आणि शताब्दी महोत्सवाबद्दल संपुर्ण  माहिती दिली .  
सर्व मुलींनी आपल्या गुरुजनांनसोबत फोटो काढले , उपस्थित सर्व गुरुजनांनी मुलींची आस्थेवाईकपणे चौकशी केली .   
या प्रसंगी . प्राचार्या श्रीमती कविता जगताप मॅडम,उपप्राचार्य श्री.  चंद्रकांत  ढाणे सर, पर्यवेक्षक श्री.  डी. जी.पवार सर,पर्यवेक्षक श्री एकल सर,चित्रकला शिक्षक श्री  पाडळे सर व याच बॅचच्या परंतु सध्या याच शाळेत कार्यरत असलेल्या सौ. ज्योती बगाडे मॅडम व इतर कर्मचारी  उपस्थित होते. 
यानंतर सौ. स्फूर्ती जाधव (पिसाळ ) हिचे मिस्टर श्री  विजय पिसाळ नातेपुते यांनी मुलींना मैत्रीवर  छोटेखानी मार्गदर्शन  केले  , मैत्री  का केली पाहिजे , मैत्रीची व्याख्या काय?  मैत्री मुळे आनंदी कसे राहता येते , मैत्रीत सुख दुःख कशी वाटून घेतली पाहिजेत   हे ही  सांगितले . सर्व मुलींनी या छोटेखानी भाषणाला मनमुराद दाद दिली . 
श्री विजय पिसाळ यांनी समयोचित एक कविता तयार करून मुलींच्या चेहऱ्यावर  आनंद निर्माण केला .  सदर कवितेची  शब्दरचना . . 
किती गोड तुम्ही आणि तुमची कन्या शाळा ! 
एकमेकींना तुम्ही लावता खूप  लळा ! 
विसरता येणार नाही ना ,  वही , पुस्तक आणि फळा ! 
जाग्या झाल्या आठवणी जुन्या  आणि फुलला ना आनंदाचा मळा ! 
तुमच्या चेहऱ्यावर असेच राहूद्या हास्य,  कायम राहू द्या असाच लळा ! 
वरील छोटेखानी भाषणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्तावना 
 सौ. सुनिता शिंदे(शिर्के ) यांनी केली .  
सदर कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलींनी ,  संपूर्ण शाळेतील जुन्या आठवणी जाग्या करत शाळेत फेरफटका मारला ,  नंतर सगळ्या सख्या मैत्रिणींनी  अंगत पंगत गोल  एकत्र बसून,  आम्रखंड, पुरी, पनीर मिक्स  भाजी  ,   भजी  , पापड, मसालेभात, चटणी , अशा सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.   जेवण करत करत खूप हास्यविनोद करत करत छानपैकी एकमेकींना  आग्रहाने जेवण  करायला  लावले . 
जेवणानंतर सर्व मुलींनी  छानपैकी गप्पा मारल्या आणि वर्गमैत्रिण सौ. मंगल झंवर (राठी) हिने बनवलेल्या थंडगार  फ्रूट सॅलेडचाही मनमुराद आस्वाद घेतला . .  
यानंतर  ,  सर्व मैत्रिणींनी  हातावर सुंदर अशी मेहंदी काढली व त्याचे फोटोही  काढले. 
सगळ्या सख्या मैत्रिणींना इतका आनंद झाला होता हे शब्दात सांगणे कठीणच,   सगळ्या मैत्रिणींचा वावर खूप ताणतणाव विरहित होता . त्यांना मनापासून खूप आनंद झाला होता . म्हणून 
 खूप दंगामस्ती चालू होती .  सर्व मैत्रिणींच्या आग्रहाखातर 
 मैत्रीण कु.  शितल लांडगे हिने "मला जावू द्या ना घरी " ही लावणी अतिशय छान  सादर केली .  शितल लांडगे हीचे खूप मोठे कार्यक्रम होतात.   अशा गोड स्नेहमेळाव्याच्या  कार्यक्रात  सगळ्या मैत्रिणी भावूक झाल्या होत्या ,  खूप मैत्रिणी वेगवेगळ्या क्षेत्रात नावाजलेल्या आहेत. 
कार्यक्रम संपला पाहिजे असे कुणालाही वाटत नव्हते पण वेळ आली निरोप घेण्याची , 
 सगळ्यांनी एकमेकींना परत भेटण्याचे ,  सुख दुःखात सहभागी होण्याचे जणूकाही वचन या निमित्ताने दिले .  तसेतर कुणाचेही  पाऊल शाळेतून बाहेर पडत नव्हते  पण सगळ्यांना आपआपल्या घरट्याकडे जावेच लागणारं होते .  जड अंतकरणाने निरोप घ्यायची वेळ येऊच नये असेच प्रत्येकीला वाटत होते . कुणी संसारात तर कुणी आपआपल्या व्यापात 
हरवलेल्या चिमण्या  निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्या .  
. कित्येक वर्षांनी भेटल्याचा आनंद होताच, 
आणि परत भेटण्याची ओढही होती ,  जुन्या आठवणी  जागवून   यापुढेही  आनंदी जीवनाचा प्रवास करत करत पुन्हा पुन्हा एकत्र येण्याचा शब्द देऊन बाय बाय केले  आणि  भावनांचे कंठ दाटले . 
आपोआप  ओलावले नयन, 
किंचित  आश्रूंनी वाट मोकळी केली !
भेटणे व्हावे  निरंतर,  आयुष्य रहावे सुखी  चिरंतन! 
🙏🙏

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  , निर्मला मोहिते , ज्योती बगाडे  यांनी खूप परिश्रम घेतले ,  निर्मला मोहिते हीने सर्वांना एकत्र करण्यासाठी , नंबर व पत्ते शोधण्यासाठी खूप मेहनत घेतली . 
या बद्दल सर्व मुलींच्या वतीने  निर्मला  मोहिते हीचा सत्कार श्री.  विजय पिसाळ यांनी केला तर ज्योती बगाडे हीचा सत्कार  , शिल्पा शिंदे , सुनिता शिंदे व सोनाली शिरसाठ यांनी केला . . 
सदर स्नेहमेळाव्याला. 
ज्योती बगाडे ,  मेघा मोहिते ,  निर्मला मोहिते ,  सोनाली शिरसाठ, स्फूर्ती जाधव, सुनिता शिंदे उर्फ  संध्या  शिर्के ,  रिना चव्हान, मनिषा यादव,  जयश्री पाटूकले , योगिता निकम,  स्मिता उंबरदंड, दिपाली अंबेकर,  मेघा घाडगे ,  पुष्पलता भोसले ,  शितल रजपूत,  मंगल झंवर,  शिल्पा निकम, अनिता पाटील,  मोनाली यादव, लता महाजन, विमल बर्गे ,  जबीन शेख,  निलम निंबाळकर,  गीता ढवळे ,  शितल लांडगे . या मैत्रिणी  उपस्थित होत्या .










बुधवार, १३ एप्रिल, २०२२

मला भावलेले नेतृत्व, अर्थात मा. श्री . धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील

चालू घडामोडींचे विश्लेषण



*मला भावलेले नेतृत्व*
मा . श्री .  धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील तथा आमचे आवडते भैय्यासाहेब. . 
शब्दांकन. . 
श्री . विजय पिसाळ नातेपुते. . 
आमच्या तीन पिढ्या फक्त मोहिते पाटील परिवारावर प्रेम करणार्‍या , मोहिते पाटील कुटूंबाशी  एकनिष्ठ असणार्‍या  आहेत,  कित्येकजण मोहिते पाटील कुटूंबाच्या विरोधात गेले व  परत वैयक्तिक स्वार्थासाठी मोहिते पाटील परिवाराच्या   जवळ आले ,  मोहिते पाटील यांच्यामुळे कित्येकजण  करोडपती  झाले नावारूपाला आले , त्यातील कित्येकजण छुप्या पद्धतीने दगाबाजी करतात आणि तेच मांडीला मांडी लावून बसतात. .  पण आम्ही स्पष्ट बोलणारे जरुर असलो तरीदेखील 
 आम्ही कधीही मोहिते पाटील परिवाराची साथ सोडली नाही,  दगाबाजी केली नाही आणि कोणत्याही पदाचीही  अपेक्षाही बाळगली नाही.   कारण मोहिते पाटील परिवाराचा निष्ठावंत सैनिक हेच पद आमच्यासाठी महत्त्वाचे आहे .  कारण  या  परिवारांने एकवेळ एखाद्याचे चांगले करता नाही आले तरी चालेल पण कुणाच्या अन्नात माती कालवायची नाही , कुणाचेही वाटोळे करायचे नाही . . हे  कायम जपले आहे .   अगदी विरोधकांनाही कधी त्रास दिला नाही की विरोधकांची कामे कधी  आडवली नाहीत ,  जात पात धर्म यावरून भेदभाव केला नाही म्हणून  मोहिते पाटील परिवारावर  आम्ही प्रेम करतो .  आमचा पक्ष मोहिते पाटील हाच होता  आहे व राहिल   ते राष्ट्रवादीत असतानाही आम्हाला राष्ट्रवादीशी काहीही घेणेदेणे नव्हते  आणि ते भाजपात आहेत त्याचेही आम्हाला सोयरसुतक नाही . कारण आमचे प्रेम फक्त मोहिते पाटील परिवारावर आहे. त्याच घराण्यातील  अतिशय कार्यकुशल नेतृत्व. म्हणजे  धैर्यशील भैय्या आहेत . काम कोणतेही असो ते तडीस नेण्याची क्षमता  ,  नेतृत्व करण्याची धमक यामुळेच 
 एक झंझावाती नेतृत्व  म्हणून भैय्यासाहेब नावारूपाला आले आहेत. 
राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रात मी खूप माणसे जवळून पाहिली , कित्येकांशी जवळचे संबंध आले , पण या सर्व माणसांत विशेष भावलेले व्यक्तीमत्व,  आदरयुक्त नेतृत्व  म्हणजे    धैर्यशीलभैय्या  मोहिते पाटील.  
भैय्यासाहेब  हे रसायन खूप वेगळे आहे . अचूक माणसांची पारख करणे ,  माणसे जोडणे , कार्यकर्त्याला ताकद देणे,  कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणे व तातडीने कोणत्याही समस्येवर  मार्ग काढणे यामुळे तरुण वर्गात भैय्यांची क्रेझ आहे.  दांडगा जनसंपर्क,  अभ्यास  करुन निर्णय घेण्याची क्षमता यामुळे  भैय्या  प्रत्येक गोष्टीत एकदम काटेकोर आहेत, नियोजनाच्या बाबतीत भैय्यांचा हात कुणीही धरणार नाही ,  माणसे जोडण्याची आवड प्रचंड असलेलं हे व्यक्तीमत्व.  मोहिते पाटील परिवाराचा अभेद्य गड आज जोमाने सांभाळत आहे.  भैय्यांनी ग्रामपंचाय,  पंचायत समिती व जिल्हा परिषद  या ठिकाणी काम करत असताना वेगळीच छाप जनमानसात सोडली आहे.  जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात  विजयदांदांची जागा रणजिदादांनी व बाळदादांची जागा धैर्यशील भैय्यांनी घेतलीय असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही .   समाजकारण व  राजकारण करतांना कष्ट घ्यायची तयारी व अभ्यास या दोन्हीमुळे भैय्या यश खेचून आणतात.  जनतेच्या प्रश्नावर कायम आवाज उठवण्याचे काम भैय्यांनी केले आहे ,  महावितरणने ऐन  अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन  कट करण्याचा धडाका लावला होता ,  सर्वप्रथम  भैय्यांनी  या सुलतानी वसुली विरुद्ध आवाज उठवला आणि अधिकार्यांना वटणीवर आणून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पुर्ववत केला .   दुष्काळात बंधारे भरुन घेण्यासाठी  लाक्षणिक उपोषण भैय्यांनी  केले .  भैय्यांनी शिवरत्न  शिक्षण संस्था व शिवामृत  दुध संघ या संस्था  अतिशय सचोटीने चालवल्या आहेत,  मुलां मुलींची शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे  , त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून भैय्यांनी शिवरत्न पॅटर्न राबवला असून  ,  कित्येक विद्यार्थी / विद्यार्थीनींना  पुणे, मुंबई, लातुरच्या तोडीचे शिक्षण अकलूजला उपलब्ध झाले आहे . शिवामृत  दुध संघाने कात टाकली असून सभासद शेतकरी बांधवांना  चांगला दर मिळतो आहे आणि शिवामृत शॉपीच्या माध्यमातून रुचकर पदार्थ ग्राहकांना उपलब्ध होत आहेत व शिवामृत शॉपीच्या  बेरोजगार तरुणांना रोजगाराची खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे .  अमॅझॉन सारख्या होम डिलिव्हरी सर्विसच्या माध्यमातून  ,  शिवामृतचे पदार्थ घरपोच मिळत आहेत. 
तालुक्यातील खेडोपाडी भैय्यांचा संपर्क अफलातून आहे . सगळे जयंती समारंभ, लग्न समारंभ,  आणि वैयक्तिक  सुख दुःखात भैय्या जनतेच्या भेटीगाठी घेत असतात, लोकांना धीर देतात.  कोरोनात भैय्यांनी असंख्य लोकांना मदत केली आहे .  त्यामुळे त्यांना बहुसंख्य लोक दयावानही म्हणतात,  लोकांसाठी सदैव उपलब्ध होणे आणि स्वतः लोकांच्या समस्या जाणून घेऊन समस्थ अधिकारी व कर्मचारी यांच्याशी  बोलून समस्या सोडवणे यामुळे गोरगरीबांना भैय्यांचा आधार वाटतो. सहकार महर्षी काकासाहेबांनी माणसे जोडण्याचा वारसा घालून दिला तोच वारसा भैय्यासाहेब समर्थपणे पुढे चालवला  आहे.  खेडोपाडी रस्ते ,  गावांसाठी नवनवीन योजना  कशा राबवता येतील यासाठी भैय्यासाहेब व रणजितदादा कायम संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना भेटून जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणता येईल ते पहात असतात.  सगळ्या पक्षातील  सगळ्या नेत्यांचे संबंध मोहिते पाटील परिवारा बरोबर चांगले असल्याने कामे सहजपणे मार्गी लागत आहेत.  राजकारणात खूप लोक  शब्द पाळत नाहीत, खोटे बोलतात पण भैय्यासाहेब दिलेल्या शब्दाला पक्के आहेत. जे काम होणार आहे त्याची तड जागेवर लावण्याचे काम भैय्यासाहेब करत आहेत.
म्हणून भैय्यासाहेबांचे नेतृत्व मला विशेष भावते. . 
आज भैय्यासाहेब यांचा वाढदिवस. .  आमच्या साठी एक उत्साहाचा , आनंदाचा दिवस. . 
भैय्यासाहेब यशवंत व्हा !  किर्तीवंत व्हा  !  दीर्घायुषी व्हा हीच श्री शंभू महादेव व आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना ! 
शुभेच्छुक. .  श्री विजय पिसाळ नातेपुते. .




गुरुवार, ३१ मार्च, २०२२

जीवन म्हणजे म्हटलं तर एक परिक्षा !

चालू घडामोडींचे विश्लेषण





जीवन म्हणजे म्हटलं तर आहे एक  परीक्षा ! 
इथला प्रत्येक प्रश्न सोडवावाच लागतो तरच  कुणीतरी करते आपली समीक्षा ! 
प्रश्नच  नीट समजले नाहीत आणि उत्तरेही आली नाहीत तर मात्र ,  सगळे सोडून देतात आपल्याकडून अपेक्षा ! 
या भयंकर सिमेंटच्या जंगलात, भलेही  वाघ सिंह रहात नाहीत, तरीदेखील वाटते जगण्याची भिती ,  आपलीच  आपल्याला करावी लागते रक्षा ! 
तुमचा संघर्ष, तुमचे यश  ,  तुमचा प्रभाव  यावरच तुमची ठरते दिशा ! 
तुमच्याकडे असेल, गाडी , बंगला आणि पैसा तर तुमच्याशी बोलताना लोकांची असते गोड गोड भाषा ! 
जीवन म्हणजे म्हटलं तर आहे ना परिक्षा ! 
सुखी रहायचे असेल तर ठेवावी  लागते काय आशा ! 
ध्येय प्राप्तीची उंच शिखरे गाठण्यासाठी  प्रगतीची  बाळगावी लागते मनिषा ! 
कितीही संकटे आली तरी  पुढे चालावे लागते ,  करुन चालत नाही नशा ! 
दिवसभर कष्ट असतील प्रामाणिक  तर  गोड गोड वाटेल निशा ! 
जीवन म्हटलं तर एक आहे परिक्षा ! 
©®
कवी . . विजय पिसाळ नातेपुते. . ९४२३६१३४४९

शनिवार, २६ मार्च, २०२२

कळ्यांचे आनंदी जग

. . . . . . . . . . . . 

   का कोण जाणे खूप आनंद झाला  मला बागेत  जाताना ! 
 फिरता   फिरता बागेत  दिसल्या मला दोन कळ्या एकमेकींशी बोलताना ! 
हितगुज  ऐकत होतो मी त्यांचे , बोलत होत्या  एकमेकींशी ,  आनंद आहे  छोटे आयुष्य जगताना ! 
वेदना होत नाहीत  कसल्याही  तुम्ही आम्हाला  तोडताना ! 
कारण आमचे आयुष्य सुंदर असते इतरांना सुगंध देताना ! 
खूप सुखात पाहिलं मी कळ्यांना  वार्या बरोबर हळूवारपणे डोलताना ! 
जणू हसतमुख वाटत होत्या दवबिंदूंचे टपोरे थेंब झेलताना ! 
प्रसन्न झाल्या होत्या कोवळी सुर्यकिरणे अंगावर घेताना ! 
हळूच पहात होत्या सभोवताली फिरणाऱ्या फुलपाखरांना ! 
ऐकत होत्या उंच भरारी घेऊन  मंजुळ गाणी गाणार्या निसर्गातील लेकरांना   ! 
हळूच मला पहात होत्या इकडे तिकडे मी निसर्गाचा आनंद घेताना  ! 
मी मनाशी म्हणालो कळ्यांसारखे छोटे आयुष्य जगावे पण आनंदी रहायला पाहिजे इतरांना सुखी राहताना  ! 
मलाही इतरांसाठी सुख मागायचे आहे ,  विविधतेने नटलेले आयुष्य  जगताना   ! 

रचना . . . विजय पिसाळ नातेपुते. . 
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

गुरुवार, २४ मार्च, २०२२

स्वातंत्र्य तुला जगण्याचे !

      शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

      युक्रेन -रशिया युद्धातून आम्ही काय बोध घेणार?


      चालू घडामोडींचे विश्लेषण
      . . . . . . . . . . . . . . . . . . . 

      रशिया युक्रेन युद्ध ! ! ! 

      रशिया युक्रेन युद्धातून आम्ही काय बोध घेणार? 

      पुर्व युरोप व रशिया यांना लागून असलेला देश म्हणजे युक्रेन.  बहुसंख्य लोकांचा धर्म ख्रिश्चन आहे.  पुर्वी हा देश सोव्हिएत युनियनचा भाग होता मात्र  नव्वदच्या दशकात  सोव्हिएत युनियनचे पंधरा तुकडे झाले  त्यापैकीच हा एक देश युक्रेन. 
      युरोपशी व रशियाशी नजिक  असल्यामुळे इथे इंग्रजी , रशियन भाषा  व संस्कृती दिसून येते .
       इथे गुन्हेगारीचे प्रमाण जवळपास नाही म्हटले तरीदेखील चालेल.  
      युक्रेन छोटासा पण  अतिशय सुंदर देश आहे . 
       इथे कमी खर्चात  अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण मिळते  म्हणूनच खूप भारतीय इथे मेडिकलचे शिक्षण घेत आहेत.
      या देशात   मोठ मोठी सुविधा युक्त  विद्यापीठे आहेत. 
      सगळीकडे  रस्ते  चकाचक आहेत. सुंदर इमारती आहेत.  सर्व सुखसोयी आहेत. 
       रेल्वे सेवा , विमानसेवा ,  एकदम उच्च दर्जाची आहे . 
       लोकांचे राहणीमान एकदम उच्च दर्जाचे आहे . 
       नैसर्गिक साधनसंपत्ती ,  मुबलक खनिज संपत्ती लाभलेला हा  देश आहे .  आर्थिक सुबत्ता आहे.  सुंदर निसर्ग  लाभलेला आहे. 
        युक्रेनची लोकसंख्या जवळपास  साडेचार कोटींच्या आसपास आहे . 
      असे असूनही युक्रेन हा रशियाचा एक दिवस सुद्धा प्रतिकार करु शकला नाही .  
      कारण काय असेल ?  
      तर तिथल्या लोकांकडे राष्ट्रासाठी  लढण्याची  वृत्ती नाही . युक्रेनकडे  पुरेशी  युद्ध सामुग्री नाही .   विशेषतः आपल्या सारखा त्यांना वारसाही नाही. 
      छत्रपती  शिवरायांसारखे लढण्याची प्रेरणा देणारे पुरुष त्या भूमीत जन्माला आले नाहीत. अन्याय अत्याचार या विरुद्ध व  आपल्या भूमीच्या रक्षणासाठी  जीवावर उधार होणारे व परिणामांचा विचार न करता हाती शस्त्र घेणारे  , सुखदेव, राजगुरू , भगतसिंग सारखे स्फूर्तीनायक तिथे  जन्माला आले  नाहीत.  त्यांच्याकडे , मराठा (महाराष्ट्रीयन), जाट, रजपूत, शिख, गुज्जर,   असे जीवावर उदार होऊन लढणारे लोक नाहीत.  राष्ट्रप्रेमाणे प्रेरित होऊन जीवाची बाजी लावणारे वीर तिथे जन्माला आलेच नाहीत.  अन्यायाचा प्रतिकार करण्याची नैसर्गिक वृत्ती त्यांच्या अंगातच नाही.
      म्हणून त्यांना आजच्या परिस्थितीत आपल्या  मुलांबाळांना  घेऊन बंकरमध्ये उपाशी झोपायची वेळ आली आहे .  
      पैसा , संपत्ती या गोष्टी त्यांच्यासाठी आजच्या घडीला  जवळपास गौण झाल्या आहेत.  
      ते फक्त जगाकडे आम्हाला वाचवा अशी याचना करत आहेत. प्राणाची भीक  मागत आहेत  पण जगातील कोणताही देश त्यांची मदत करायला तयार नाही . 
       म्हणून आज युक्रेनचे अस्तित्व जवळपास -असूनही नसल्या सारखे गलितगात्र  झाले आहे . 
      यातून आम्ही काय बोध घेणार आहोत ?  
      आम्ही आमच्या  देशात   एकसंघ भावना निर्माण करून  राष्ट्रप्रेम जागृत  करणार आहोत की नाही ? 
      पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सारख्या शेजारी  युद्धखोर देशांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत  सैनिकी शिक्षण कंपल्सरी करणार आहोत की नाही ? 
      शस्त्रसाठा वाढवून, शस्त्रसज्ज राष्ट्र निर्माण करण्यासाठी पावले टाकणार आहोत की नाही ?  
      अंतर्गत जात, धर्म, वर्ग कलह वाढणार नाहीत याची काळजी घेणार आहोत की नाही ?  
      की अंतर्गत कलहातच आपली शक्ती वाया घालवणार आहोत?  
      छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांचा प्रेरणादाई इतिहास क्रमिक पुस्तकातून  विस्ताराने शिकवणार आहोत की , अजूनही  पोती पुराण सांगत  बसणार आहोत? 
      गुप्तचर यंत्रणा ,  आधुनिक तंत्रज्ञान विकसित करुन भारतात  शस्त्र निर्मितीचे मोठ मोठे  कारखाने प्रचंड वाढवणार आहोत की नाही .  की नुसते  मंदिर मशिद करत बसणार आहोत? 
      व्यसनाधीनीतेमुळे तरुण कमजोर होतात, त्यामुळे दारु , शिगारेट, गुटखा , मावा , तंबाखू  यावर कठोर निर्बंध आणले आणणार आहोत की नाही ?  
      कुस्ती ,  रनिंग,  थाळीफेक, भालाफेक,  नेमबाजी अशा 
      देशी खेळांचे प्रशिक्षण शालेय स्तरावरच देणार आहोत की अजून क्रिकेट, क्रिकेट करत बसणार आहोत? 
        शारीरिक शिक्षण हा विषय  १०० मार्कांचा करणार आहोत की नाही ?  
      यापुढे   सदृढ युवकच देशाला वाचवू शकतात.  केवळ मिलिटरी लढेल व आपण वाचू हा भ्रम सर्वांनी डोक्यातुन काढून टाकला पाहिजे .  सैनिकांच्या मदतीला जेंव्हा राष्ट्रातील प्रत्येक माणूस जाईल तेंव्हाच राष्ट्राचा निभाव लागेल. 
      थोडक्यात बलिशाली राष्ट्र तेंव्हाच सुरक्षित राहिल जेंव्हा तुमची सैनिकी ताकद जगाला टक्कर देण्याच्या क्षमतेची असेल. 
      ©® विजय पिसाळ नातेपुते. . 
      ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

      शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

      मराठा समाजाची दिशा काय असावी ?

      चालू घडामोडींचे विश्लेषण


      सन्माननीय मराठा बंधू भगिनींनो , मी श्री   विजय पिसाळ नातेपुते . . आपणाला मनःपूर्वक नमस्कार. .  
       आपण समाजासाठी रात्रंदिवस काम करत आहात याचा आम्हाला अभिमान आहे . आपण  समाजासाठी आजवर केलेले काम व विचारमंथन खूप मोठे आहे . . 
      मराठा समाजासाठी काय योजना असाव्यात,   माझ्या मनात काय आहे हे कळावे म्हणून  संपुर्ण मराठा समाजाला उद्देशून हा छोटासा लेख लिहिला आहे . 
      आपणा सर्वांचे ध्येय आणि विचार हाच आहे की , आपल्याला मराठ्यांचा विकास करायचा आहे .  स्वाभिमानी मराठा परत एकदा उभा करायचा आहे .  लाचारी आमच्या रक्तात नाही हे जगाला दाखवून द्यायचे आहे . . आम्ही आजवर नेतृत्व केले व इथून पुढेही आम्हीच नेतृत्व करू हे दाखवायचे आहे . . आरक्षण गरजेचे आहेच पण 
      आरक्षण या एकाच गोष्टीवर फोकस न करता चौफेर काम वाढवावे लागेल. .  आरक्षणामुळे बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना रोजगार मिळेल  लाखात एकदोन नोकरीला लागतील,  पण बाकीच्या लाखो बेरोजगारांसाठीही  आपल्याला योजना आखाव्या लागतील,  निश्चित दिशा निर्माण करावी लागेल,  दिशाभूल करणारे लोकांपासून सावध रहावे लागेल. .   
      मराठा ही केवळ जात नसून मराठा हा देशाचा इतिहास आहे . मराठा हा विचार आहे . म्हणून  आम्ही कधीही कमजोर नव्हतो व नाही . . दाखवून द्यावे लागेल  आम्हाला फक्त भविष्याचा वेध घेऊन काही योजना तयार कराव्या लागतील,  व्यवसाय निवडावे लागतील. . . एकेकाळी 
      राज्यकर्ते  कोण असावेत  हे ठरवणारे आम्ही ,  
      अन्याया विरुद्ध  लढणारे आम्ही ,  संघर्ष करणारे आम्ही ,  कष्टकरी आम्ही , ताकदवान आम्ही , आमच्या  मनगटाच्या जोरावर पाहिजे ते  मिळवणारे  आम्ही  आज बर्याचदा हतबल आहोत हे चित्र निर्माण केले जात  आहे . 
      शुर आम्ही , वीर आम्ही . .  ज्ञानी आम्ही ,  पराक्रमी आम्ही 
      हे सर्व आमच्या गाठीशी व  पाठिशी असताना . . . हाच आमचा वास्तव इतिहास असताना 
      बर्याच नालायकांनी सिनेमातून आपल्या पाटलांना म्हणजेच मराठ्यांना  बलात्कारी दाखवले , व्यसनी दाखवले , स्त्रिलंपट दाखवले व आपला जगातील आदर्श समाज किती खराब आहे हे दाखवून कमीपणा देण्याचे काम केले गेले . पण हे आमच्या लक्षात आले नाही . 
      हे सुधारण्याची  वेळ आली आहे .  म्हणून कोणताही  लघूपट,  फिल्म बनवताना आपला पराक्रम, शौर्य, धाडस  , हे दाखवले पाहिजे जेणेकरून  आमची पुढची पिढी बोध घेईल व संघर्षातून पुढे जाईल  हे माझे मत आहे  . . . 
      मराठा कोणत्याही  ठिकाणी मजबूत दाखवला पाहिजे , 
      मराठा हतबल  नाही   . . . मराठा  कमजोर  नाही. .  मराठा . . व्यसनी  नाही . . मराठा आत्महत्या  करणारा  नाही  . 
      तर मराठा आजही  लाथ मारेल तिथे पाणी काढेल हे मनावर बिंबवले गेले पाहिजे . . .  मराठ्यांच्या पोरांनी संपर्षातून निर्माण केलेले कित्येक उद्योग व व्यवसाय आहेत ते दाखवले पाहिजेत  , मराठ्यांच्या पोरांनी  पाच पाच किलोमीटर पाईपलाईन टाकून  शेती फुलवली आहे हे दाखवले पाहिजे  , डाळिंब, ऊस, केळी ,  यांचे घेतलेले विक्रमी उत्पादन दाखवले  ,  मराठ्यांच्या पोरांनी ,  खेळात  प्राविण्य मिळवले आहे हे दाखवले पाहिजे . कित्येक मराठा हे जबरदस्त काम करणारे , डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, शिक्षक, शास्त्रज्ञ,  संशोधक,  उद्योजक, उद्योगपती ,  शुन्यातून विश्व  निर्माण करणारे आहेत हे दाखवले पाहिजे . 
      मराठा संघटीत होऊ शकतो हे दाखवले पाहिजे  . . 
      मराठा उद्योग होऊ शकतो , मराठा व्यापार करू शकतो . .  मराठा ,   आधुनिक शेती करू शकतो . . मराठा . . मराठा जसे  शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो , तसेच  मराठाच क्रांती करू शकतो हे दाखवले पाहिजे  . . 
      मराठा  , सर्व प्रश्न सोडवू शकतो , मराठा  आधुनिक शिक्षण घेऊ शकतो,  मराठा नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो .  मराठा एकत्र येऊन शाळा काढू शकतो , कॉलेज काढू शकतो , होस्टेल काढू शकतो,  बँका काढू शकतो , पतसंस्था काढू शकतो , मराठा एकत्र येऊन उद्योग धंदे निर्माण करु शकतो , रोजगार निर्माण करायची ताकद आमच्या मनगटात आहे . हे दाखवले पाहिजे  ,    हे सर्व एकसंघ मराठा करू शकतो हे  मनावर ठसवले पाहिजे  . .  
      व हेच आपण केले पाहिजे . . 
      आरक्षणाची लढाई लढायची आहे पण  त्या सोबत  खूप कामे करावी लागतील व करायची  आहेत. . 

      जय जिजाऊ!  जय शिवराय! 

      तुमचा . . एक मराठा बांधव. . 
      विजय पिसाळ नातेपुते . .
      ९४२३६१३४४९

      शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

      नातेपुते गावातील चौका चौकात रंगतेय निवडणूकीची चर्चा !

      चालू घडामोडींचे विश्लेषण




      गेले दोन महिने झाले नातेपुते नगरपंचायत निवडणूक सुरू आहे . ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे  प्रभाग, ७ , ८, ९, १० अशा  चार प्रभागांची राहिलेली  निवडणूक  प्रक्रिया सध्या  चालू आहे . प्रभाग १ , २, ३ , ४, ५ , ६ व प्रभाग ११ , १२, १३, १४, १५ , १६, १७ अशा   तेरा प्रभागांची प्रक्रिया  पुर्ण झालेली आहे.  एकंदर  या निवडणुकीत, साम, दाम, दंड भेद याचा सर्सास वापर झालेला दिसून आला .  नवीन प्रभाग रचना आणि राजकीय पार्श्वभुमी नसलेले पण स्वतःची ओळख निर्माण केलेल्या काही  नव्या दमाच्या  तरुणांनी या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली.  पारंपरिक गटतट व युत्या आघाड्या या सातत्याने बनतात, बिघडतात,  प्रत्येक निवडणुकीची समीकरणेही वेगळी असतात.  पण यावेळी मात्र राजकीय पार्श्वभुमी नसलेल्या   तरुणांचा उत्साह जबरदस्त पहायला मिळाला .  आम्हाला कधी संधी मिळणार की नाही?  असे  वारंवार ते म्हणत होते.   तेच ते चेहरे , त्याच त्या घरातील उमेदवार, त्याच त्या वाड्या , वस्त्या व वाडे यांच्या भोवती फिरणारे राजकारण यात आम्हाला संधी मिळत नाही  असाही सुर कित्येक उमेदवारांच्या  बोलण्यातून येत होता .   गावातील बहुसंख्य लोकांना काही उमेदवार पसंत नसतात पण केवळ पॅनल प्रमुखांवर प्रेम असते , पॅनल प्रमुखांशी जिव्हाळा असतो , पॅनल प्रमुखांशी नातेसंबंध असतात व आपल्या जवळच्या पॅनल प्रमुखांना  ताकद मिळावी म्हणून काही उमेदवारांना नाईलाजाने लोक मतदान करतात.  हेही या निवडणुकीत दिसून आले .  खाजगीत बोलताना लोक लादलेल्या उमेदवारीमुळेही पॅनल प्रमुखांवर थोडेफार नाराज दिसून आले.  कित्येक वर्ष, काही समाज बांधवांना प्रतिनिधित्व मिळाले नाही , नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग रचनेत,  त्यांना संधी मिळेल ही अपेक्षा होती पण याही वेळी पॅनल प्रमुखांनी काही जागा सेफ करण्यासाठी काही जागांवर  तडजोडी केल्या व कधीही संधी न मिळालेले समाज आजही वंचित राहिले हे एकंदर दिसून येते आहे. 
      ९०% निकाल अपेक्षित लागतील  मात्र काही वार्डातील निकाल अनअपेक्षित लागण्याची  आशा उमेदवार  बाळगून असल्याचे  दिसून येत आहे . 
      एकमात्र नक्की यापुढे  , निवडणूका बिगर पैशाच्या होतील असे वाटत नाही .