vijaypisal49. blogspot. com

रविवार, २४ मार्च, २०१९

कृष्णा भीमा स्थिरीकरण काळाची गरज! कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला विरोध का ? नक्कीच संपुर्ण लेख वाचा ! डोक्यात प्रकाश नक्कीच पडेल!

चालू घडामोडींचे विश्लेषण
*कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना खरचं अशक्य आहे का*? 
श्री विजयकाका पिसाळ नातेपुते (९४२३६१३४४९/९६६५९३६९४९) यांचे लेखणीतून. . . . . 
*केवळ आणि केवळ पाण्यासाठी टोहो फोडणार्या जनतेला विचारा पाणी म्हणजे काय असते ?*
 *दुष्काळी अवर्षण प्रवण भागातुन पिढ्यान पिढ्या शहराकडे  स्थलांतर करणार्‍या लोकांना हक्काच्या  घोटभर पाण्यासाठी झगडावे लागते हेच मुळात दुर्दैवी नाही का ?* *मुळात रोजगार निर्मिती साठी , शेतीला व पिण्यासाठी  पाणी मिळू नये याच्या इतके वाईट  ते काय असू शकते*
नेत्यांनो एकवेळ  तुम्ही राजकारणात एकमेकांची कितीही जिरवा जिरवी करा पण लाखो लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर राजकारण कराल, कल्याणकारी योजनांना विरोध कराल तर येणारा काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही . 
कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची चेष्टा करणार्‍यांनो तिला विरोध करणाऱ्यांनो,  येणार्‍या काळात जनताच काय पण परमेश्वर सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही . . . 
आज पैशाची कारणे देऊन या योजनेची खिल्ली उडवली जाते पण या योजनेमुळे लाखो लोकांची तहान भागली जाईल, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, लाखो लोकांना रोजगार मिळेल, दुष्काळी पट्ट्यातून शहराकडे जाणारे बेरोजगारांचे लोंढेच्या लोंढे थांबतील!  हे मात्र जाणीवपुर्वक विरोध करणाऱ्या लोकांकडून  सांगितले जात नाही . 
केवळ एका विजयसिंह  मोहिते पाटलांना या योजनेचे श्रेय मिळेल म्हणून लाखो लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? 
 *राजकारणापलिकडे *कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे महत्व*. . . .

*राजकीय इच्छाशक्ती होती म्हणून*
*निर्मदेचं पाणी कच्छ ला शेकडो किलोमीटरचा कॅनॉल करून  हजारो कोटी खर्च करून जाऊ शकले,  वाळवंटाचे सुद्धा नंदनवन होऊ शकले* तर  कृष्णा भीमा स्थिरीकरण  योजना का होऊ शकत नाही , तिला  विरोध का ? 
*केवळ इच्छाशक्ती व तळमळ  म्हणून विजयसिंह   मोहिते पाटील तथा दादासाहेब राजकीय करिअर पणाला लावून या योजनेसाठी गेली १० वर्ष  लढत आहेत ते जनतेसाठीच ना !* बांधवांनो. . . . .  
*११० मिटर उंचीचे दोन टप्पे ४ मिटर (१३. १२फुट) व्यासाच्या महाकाय ३ पाईप मधुन,  ५०० अश्वशक्तीच्या १६ पंपाच्या साह्याने, २५ ते ३० किलोमीटर लांबीच्या  पाईपलाईन मधून ताकारी योजना साकार झाली आहे! (एकदा जाऊन बघा)   . . . . . . . . . . . . तर कृष्णा भीमा स्थिरीकरण का होऊ शकत  नाही ?*
केवळ मोहिते पाटलांना  विरोध म्हणूनच ना? . . . या योजनेला विरोध करणाऱ्या  पुढार्यांच्या नादी लागून आपल्या पुढच्या पिढ्या बरबाद करायच्या का ? 
*कृष्णा नदीच्या पात्रातून  पाणी उपसा करणार्‍या  ज्या टेंभू आणि म्हैसाळ योजनेमुळे हजारो हेक्टर आटपाडी व सांगोला तसेच  तासगावचा आणि  खानापूरचा काही  भाग ओलिताखाली आला , ज्या योजनेला तत्कालीन राजकीय  इच्छाशक्ती अभावी साकार व्हायला ३० वर्ष लागली पण शेवटी टेंभू व म्हैसाळ योजना साकार झालीच ना ?  एकेकाळी  या योजना पण कदापि शक्य होणार नाहीत,  तेवढा पैसा नाही , गणित जुळत नाही  अशी आवई उठवली जात होती! टोकाचा विरोध होत  होता, आहो  त्याच योजनेने लाखो लोकांचे कल्याण केले ति योजना झालीच ना !* आणि दुष्काळी पट्ट्यात डाळिंब बागा फुलल्या माळरान फुलले  व शेतकरी सुखावला ना ? 
फक्त त्या योजनेचा रेटा मोठा होता व त्याचे  महत्व जनतेला कळले होते, म्हणूनच  जनरेट्यापुढे सरकार झुकले ना! 
राजकारणाच्या नशेत डोलणार्या व काहीही करून सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना व 
आपल्याला कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे महत्व कळेल का ?
*७० किमी लांब ३८ किमी रुंद  महाकाय कोयना धरन होऊ शकते*
*महाकाय उजनी धरण होऊ शकते*
*महाकाय मेट्रो , मोनोरेल होऊ शकतात*
*केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांची इच्छाशक्ती व वाजपेयींची मदत करण्याची भावना होती म्हणून* *अशक्यप्राय वाटणारा ,कित्येक लांबीचे डोंगर व बोगदे खोदून काढलेला मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग होऊ शकतो*
तर कृष्णा भीमा स्थिरीकरणाला विरोध का ? 
*प्राध्यापक मधू दंडवते यांनी ३० वर्ष संघर्ष करुन जनआंदोलने करून कोकण रेल्वे साकारली , त्यासाठी ५०० किलोमीटरच्या आसपास डोंगर फोडावा  लागला, शेकडो पुल बांधावे लागले कित्येक अपघात झाले, झाडांच्या कत्तली कराव्या लागल्या ,  मोठा संघर्ष झाला पण लढाऊ जनतेने ही चळवळ हातात घेतली आणि कोकण रेल्वे साकारली,  केवळ कोकण रेल्वेला वेळीच हाती घेतले नाही म्हणून तिथली काँग्रेस संपली*

*कोकण रेल्वे होते मग कृष्णा भीमा स्थिरीकरण का होऊ शकत नाही!*

*इतकच  काय तर काहींच्या  स्वतःच्या इच्छेखातर लवासा होऊ शकते*
*मुंबई ते नागपुरला जोडणारा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील हातात सत्ता असल्यामुळेच ४५ हजार करोड पेक्षाही जास्त खर्च असणारा समृद्धी महामार्ग मार्गी लागलाच ना?*
हे मोठ मोठे प्रकल्प साकारतानाही विरोध झालाच मोठ्या प्रमाणावर  खर्च आला पण राजकीय पुर्णपणे सत्ता असली की त्या भागातील नेत्यांना ते करणे शक्य झाले . 
*आहो कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना झाली तर*
 लाखो लोकांची  पाण्याची तहान भागली जाईल, समुद्राला वाहून जाणारे पाणी आडवले जाईल, ग्रामीण भागातील  खेडी समृद्ध होतील, तरूणांच्या हाताला काम मिळेल,  मजूरांची रोजगारासाठी भटकंती थांबेल, सकल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल, नवनवीन साखर कारखाने उभे राहतील,  असणारे कारखाने बंद पडणार नाहीत , सातत्याने पडणार्या दुष्काळामुळे  कत्तलखान्यात जाणारे पशूधन वाचेल, फळबागा होतील, दुध धंदा बरकतीला येईल, हाताला काम नसल्याने तरूणांचे विवाह होत नाहीत ते होतील,  त्यांना मुली मिळत नाहीत, लग्न ठरत नाहीत ते सुद्धा सर्व व्यवस्थित होईल याचातरी विचार विरोध करणाऱ्या पुढार्यांनी करायला हवा . . वैयक्तिक श्रेय चुलीत घाला . . . 
पण दर ३ ते ४ वर्षांनी पाण्या अभावी व दुष्काळाचा सामना करावा लागल्यामुळेच  आजवर असंख्य शेतकर्यांनी आत्महत्या केल्या , कित्येक तरूणी देखील विधवा झाल्या , काबाडकष्ट करणारी माणसे केवळ पाण्याअभावी हतबल झाली , कुणी गळफास घेतले कुणी, विषारी औषध प्राशन केले तरीदेखील आमचे राजकीय पुढारी केवळ राजकारणात व्यस्त असे का रे ? कपाळकरंटे तुम्ही ! आज दुष्काळी पट्ट्यात फिरा चिमणीला प्यायला पाणी नाही , झाडे सारी वाळू लागली बसायला सावली नाही . . 
कशी जगत असतील तिथली माणसे . ..चार्या अभावी  खपाटीला पोट गेलेली जनावरे , हंडाभर 
पाण्यासाठी वणवण हिंडणारी बायकामाणसे, लहान लहान मुले व आटलेल्या विहिरी बघितल्यावर मन हेलावते ह्रदय पिळवटून जाते , दुःख होते. म्हणून कृष्णा भिमा स्थिरीकरण झाली पाहिजे . . 
मोहिते पाटलांना तुम्ही राजकीय विरोध करा सत्ता प्राप्तिसाठी शतप्रतिशत राजकारण करा पण जनतेच्या जीवावर मात्र उठू नका ..आमच्या पुढील पिढ्यांच्या अन्नात माती कालवू नका !  
कुणाचीतरी तळी उचलण्याच्या नादात, कुणालातरी खूश  करण्याच्या नादात आपल्या भागाचे वाळवंट करू नका . 
या अगोदरच, फलटण, माळशिरस, सांगोला , पंढरपूरच्या हक्काचे पाणी बारामतीला  पळवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्याला कडाडून विरोध केल्यामुळेच ते पाणी पळवू शकले नाहीत. . हा इतिहास आहे 
तरीदेखील पुर्वी निरा उजवा कॅनॉल ६५%व निरा डावा कॅनॉलचे  ३५%पाण्याचे वाटप होते ते त्यांनी सत्तेच्या जोरावर  ६०/४० केलेच हा फलटण, माळशिरस, सांगोला , पंढरपूर तालुक्यावर  अन्याय नाही का ? म्हणूनच आपला हक्काचा न  डगमगणारा नेता पाहिजे . . दुसर्‍याच्या दावणीला बांधलेली स्वाभिमान शुन्य  बुजगावणी काय कामाची ? सोलापूर, सातार्याचे निर्णय इथून झाले पाहिजेत, त्यासाठी बारामतीच्या पायावर डोके कशाला ,  बारामतीतून होणारा हस्तक्षेप थांबायचा असेल तर  त्यासाठी आपल्या भागातील नेत्यांना पाठबळ द्या , लाचारी नको असेल तर लढाई लढा ! 
फलटण, माळशिरस, सांगोला , पंढरपूर 
या तालुक्यातील दुष्काळ कायमचा  हाटला पाहिजे या साठी धोम बलकवडी, व निरा देवधर कॅनॉलची कामे तातडीने होणे आवश्यक होते त्यालाही पुरेसा निधी त्यांनी दिला नाही . . 
म्हणून बारामतीकरांना दुष्काळी भागातील जनता जाब विचारते . .
राजकारणात सत्तेचा ताम्रपट कुणीही जन्मताच घेऊन आलेला नसतो, सत्ता येते जाते पण तिचा वापर जनतेसाठी झाला पाहिजे . . व राजकीय आकस आणि सुडाचे राजकारण करणारे जास्त काळ टिकत नाहीत. 
एखादी योजना जरी खर्चिक असली तरीदेखील ति जनसामान्य लोकांच्या जीवनात क्रांती करणारी असेल तर, लोकांना न्याय देणारी असेल तर,  त्या योजनेला राजकारण विरहित पाठिंबा मिळालाच पाहिजे !
म्हणून हा लेखन प्रपंच. . . लेखक. . विजयकाका  पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
टीप. . 
बरेच जण नाव खोडून लेख, स्वतःचे नाव टाकून पुढे पाठवतात. . ..तसे न करता आहे असा लेख शेअर करा !