vijaypisal49. blogspot. com

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

मालकाच्या तुकड्यावर भुंकणारा कडक कुत्रा !


चालू घडामोडींचे विश्लेषण. . . . 

एका मालकाने आपल्या  शेतात  एक कुत्रा  पाळला  होता  व मालक रहायला गावात होता.  मालक रोज त्या कुत्र्याला  न चुकता  भरपुर खायला नेवून देत होता .  त्यामुळे कुत्रा  एकदम गुटगुटीत झाला  होता  . मालकाच्या शेताची राखण तो एकदम प्रामाणिकपणे  करत होता  .  
एक दिवस असा आला की , मालकाला एक महिन्यासाठी परगावी जायला लागणार होते ,  कुत्रा शेताची राखण चांगली करत असल्यामुळे  मालकाला कुत्र्याची  खूप चिंता होती  पण त्याचे शेत लांब असल्यामुळे त्या कुत्र्याला  खायला टाकायला कुणी जाईल अशी परिस्थिती नव्हती  , आणि कुत्राही  कडक असल्यामुळे त्याला  कुणाकडे ठेवणेही शक्य नव्हते . तो फारच कडक असल्यामुळे  तिकडे त्याला खायला भाकरी व पाणी  कोणीतरी जावून टाकेल  अशीही परिस्थिती नव्हती ,   कुत्रा फक्त मालकाचेच ऐकणारा होता , मालकाने छो म्हटले की तो लगेच कुणावरही कशाचाही मागचा पुढचा विचार न करता तुटून पडायचा ,  त्यामुळे त्या कुत्र्याला सगळे घाबरून असायचे व कुत्र्याचा मालक तर फारड कडक होता .  अशी सर्व परिस्थिती असल्यामुळे  मालकाने मग नाईलाजाने कुत्र्याला  शेतावर मोकळे सोडून गावाला जायचा निर्णय घेतला . शेवटी करणार तरी काय?   आणि मालक काळजावर दगड ठेवून कामासाठी बाहेरगावी एक महिन्यासाठी निघून गेला .  पहिला  दिवस गेला कुत्र्याला  खूप भुक लागली , तो मालक खायला घेऊन येईल याची वाट पाहू लागला  .  पण मालक काही आला नाही .  असे दोनतीन दिवस  गेले, 
 कुत्रा  मालकाची वाट पहात बसायचा ,  एकदम भुकेने व्याकूळ  होऊन त्याचा जीव कासावीस व्हायचा पण  सवय वाईट असते ना ? आयते  तुकडे खायची !   शेवटी त्यालाही  कळून चुकले मालक काय येत नाही . आपण  उपाशीपोटी मरण्यापेक्षा काहीतरी धडपड केलेली बरी . 
तो इकडे तिकडे फिरु लागला ,   फिरता फिरता त्याला  धडपडत, धडपडत,  शिकार मिळू लागली , सुरवातीला त्याला  एखादी दुसरीच शिकार मिळायची कसेबसे अर्धवट  पोट भरायचे  पण आठ पंधरा  दिवसांत तो  शिकार करण्यात हळूहळू पण  जवळपास पारंगत झाला आणि नियमितपणे शिकार करून जगू लागला . .  जवळपास आत्मनिर्भर झाला असेच क्षणभर म्हणूया   ! आता त्याला  मालकाचीही गरज उरली नव्हती आणि त्याच्या आश्रयाचीही गरज उरली नव्हती . . . 
वरील स्टोरीवरुन  एक लक्षात येते की जोपर्यंत तुम्ही कुणाच्यातरी तुकड्यावर जगता तोपर्यंत तुम्हाला  दुसर्‍याच्या तुकड्यावर जगायची सवय होते आणि तुम्ही स्वतः कष्ट करायचे विसरुन जाता किंबहुना तुम्ही तुकड्यासाठी लाचार होऊन मालकापुढे गोंडा घोळता . मालकाने छो म्हटले की धावू लागता , प्रसंगी  दुसऱ्यावर भुंकू लागता पण तुम्हाला हेही माहिती नसते की , वेळ आली तर मालक आपल्याला सोडून  देणार आहे .  मालक परत आपल्याला तुकडाही टाकणे बंद करणार आहे . 
मित्रांनो म्हणून आपल्या आयुष्यात कितीही कष्ट पडले तरीदेखील  कुणाच्याही तुकड्यावर जगू नका . .  स्वाभिमानाने कष्ट करा आणि  आयुष्यात स्वावलंबी बना . .  त्या कुत्र्या सारखे 
फार कडक वागू नका ,  गोड व नम्र वागा !  आपोआप तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल. . 
जे साध्या मुक्या कुत्र्याला कळते  की आपण शिकार केली नाही तर आपण जगणार नाही  उपाशीपोटी राहून  मरुन जावू ते आपल्यातल्या दुसर्‍याच्या  तुकड्यावर जगणारांना  कसे कळत नाही .  
परमेश्वराने आपल्याला दोन हात, दोन पाय, मजबूत शरीर आणि बोलण्यासाठी गोड तोंड दिले आहे , बुद्धी दिली आहे .   तरीदेखील आपण  कुणीतरी आपल्याला तुकडा टाकेल व मगच आपले पोट भरेल  याच विचारात कसे जगतो व कुणाच्यातरी मागे पळतो .  
कुणीतरी आपले भले करेल या भ्रामक कल्पनेतून पहिल्यांदा बाहेर पडा .  कोणताही कामधंदा करून प्रगती करा पण कुत्र्यासारखे तुकडा मिळेल या आशेने कुणाच्यातरी  मागे फिरु नका . .   अर्थात सर्वांशी आपुलकीने वागा , प्रेमाणे रहा व कुणीही सांगितले म्हणून कधीही कुणावर भुंकत बसू नका , नाहीतर मालकाने वार्यावर सोडले तर  कुणीही तुम्हाला तुकडाही टाकत नसते . . 

ही काल्पनिक  स्टोरी कशी वाटली हे मला  नक्की कळवा. . . 
स्टोरी आवडली असेल तर लेखकाच्या  नावासह नक्की शेअर करा . प्रबोधनासाठी थोडे कठोर लिहावे लागते तरच स्वाभिमान गहाण ठेवलेली पिढी जागृत होईल ना ? 
©® लेखन प्रपंच. . विजय पिसाळ नातेपुते. . . ९४२३६१३४४९
लेखक, कवी ,  व्याखाता . . ब्लॉगर. . .