vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, १२ मे, २०२२

आत्महत्या ! आत्महत्या ! ! आत्महत्या ! ! !


चालू घडामोडींचे विश्लेषण


आत्महत्या!  आत्महत्या ! !  आत्महत्या ! ! ! 

दुष्काळ पडला काही पिकले नाही ,  आत्महत्या ! 
पुर आला , पिक वाहून गेले , आत्महत्या ! 
पिकाला बाजारभाव भेटला नाही , आत्माराम! 
मुलीचे लग्न जमत नाही , आत्महत्या ! 
कर्ज झाले , आत्महत्या ! 
मुलगी पळून गेली , आत्महत्या ! 
मुलाला नोकरी लागत नाही , आत्महत्या ! 
घरात भांडण झाले , आत्महत्या ! 
 टेन्शन आले , आत्महत्या ! 
सावकार व बँका छळवणूक करतात, आत्महत्या ! 
कोणतीही समस्या निर्माण झाली की आत्महत्या ! 
आत्महत्या हाच एकमेव पर्याय आहे ? 
मान्य आहे . . 
जीवनात संकटे येतात  मनस्ताप होतो , सरकार, प्रशासकीय यंत्रणा खूप  त्रास देतात,  जगणे मुस्किल करतात,  छळवणूक होते , पिळवणूक होते ,  कष्ट करुनही पदरात काहीच पडत नाही ,  कर्ज वाढते ,  समाजातील मानसन्मान जातो ,  अपमान होतो .  परिस्थिती वाईट व विपरीत होते .  जवळचे  सगळे सोडून जातात, समाज दुषणे देतो ,  वाईट परिस्थितीत  मदतीला कुणीही येत नाही .  
पण याला उपाय आत्महत्या आहे का ? 
आम्ही  छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांचा वारसा सांगतो , खरच आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे ,  इतका मोठा आदर्श आपल्या समोर असताना आपण जीवनाला कंटाळतो ! 
 शिवरायांना , शंभुराजांना जीवनात हजारो संकटे आलीच ना !  
 पण ते संकटांना घाबरले का ?  त्यांनी संकटांशी सामना केला ना !   संकटांशी दोन हात केले ना !   शेवटपर्यंत ते लढत राहिले ना !   कुणासाठी प्रजेसाठीच ना ! 
 असली भेकड, नेबळट, घाबरट,   दळभद्री पुढची प्रजा निघेल असे जर तेंव्हा शिवरायांना वाटले असते तर कदाचित शिवरायांनी सुद्धा  स्वराज्याचा संकल्प विचारात घेतला नसता ! 
 लोकांसाठी  शिवरायांनी  स्वतःचा जीव कित्येक वेळा धोक्यात घातला आणि आम्ही  काय आदर्श घेतला ! 
आपण महापुरुषांकडुन आदर्श न  घेता आत्महत्या करतोय किती दुर्दैव आहे 
  षंढ होऊन आत्महत्या करतांना आमच्या मनात , लहान मुले, बायका पोरं , आई वडील यांचा कोणताही विचार का येत नाही . मोगलांच्या , निजामाचा , आदिलशाहाच्या , कुतुबशहाच्या , 
इंग्रजांच्या विरुद्ध आमचे पुर्वज यासाठीच लढले का ? 
लेकांनो प्रसंगी 
व्यवस्था उलथून टाका ,  कुणाचेही पैसे बुडवू नका पण तुमच्याकडे पैसे नसतील व तो भयंकर त्रास देत असेल त्याला  प्रसंगी बडवून काढा . 
पैसा मिळवण्याचे सरळमार्गी खूप मार्ग आहेत, 
वाट्टेल तो कामधंदा करा ,  शेती कोरडवाहू असेल तर  पानटपरी टाका , वडापावची गाडी टाका , पंग्चर दुकान टाका , कोणतेही काम करा , कामाला लाजू नका पण  नालायकांनो आत्महत्या करु नका . . 
किती दिवस आत्महत्या करणार तुम्ही ?  काय आदर्श पुढच्या पिढीला देणार तुम्ही . . 
वारेमाप खर्च करणे , सातत्याने  एक म्हणजे एकच पिक घेणे सोडून द्या !  पिक बदल करा , 
थोडीफार तरकारी करा ,  थोडीफार फळझाडे लावा , त्याची  हातविक्री करा , त्यातून प्रपंच चालवा . . 
लग्न, बारसे , वाढदिवस  छोटे व घरगुती करा . 
कौटुंबिक कार्यक्रम करतांना उधळपट्टी करु नका बचत करा .  व्यसनापासून दुर रहा .  
पण आत्महत्या करु नका . . 
आत्महत्या हा पर्याय नाही . 
कुटूंब रस्तावर येईल असे कृत्य करणे हे नामर्दपणाचे लक्षण आहे.
लेखण प्रपंच. . विजय पिसाळ नातेपुते. . 
९४२३६१३४४९
९६६५९३६९४९



बुधवार, ११ मे, २०२२

डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतो ?

चालू घडामोडींचे विश्लेषण    


भारतीय रुपया दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे. डॉलरविरुद्ध रुपयाची जोरदार घसरगुंडी झाली आहे. एका अमेरिकन डॉलरची किंमत 80 रुपयांना जाऊन टेकेल की  काय अशी भीती आहे.
रुपयाच्या या गरिबीवरून  जोरदार राजकारण सुरु आहे .  पुर्वी मोदींनी मनमोहनसिंग सरकारला रुपयांची किरकोळ घसरण झाली तरी हल्ला  चढवला होता व सध्या विरोधक तेच काम करत आहेत.  मुळात  रुपया नेमका का घसरतोय? आपल्यावर याचे काय परिणाम होतील? हे आपण तपासले पाहिजे .  जेंव्हा मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आपल्या देशात होते , आपले उद्योगधंदे व मार्केट तेजीत असते तेंव्हा  सहाजिकच आपल्या देशाची आर्थिक वाटचाल मजबूत दिशेने चालू असते .  देशाची निर्यात आयातीपेक्षा जास्त होऊन  परकीय गंगाजळी वाढत असते ,  यालाच सोप्पा भाषेत सांगायचे झाले तर आपली बाजारपेठ व लोकांची क्रयशक्ती वाढलेली असते.  आपल्या उद्योगधंद्यातून जास्त नफा होतो व गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो , पण आपली उद्योगधंद्यांची , शेतीची परिस्थिती बिकट झाली तर निर्यात घटते व आयात वाढते आणि परकीय चलणसाठा कमी होतो .  सहाजिकच आर्थिक मंदी यायला सुरवात होते , विदेशी गुंतवणूक करणारे लोक गुंतवणूक काढून घ्यायला सुरवात होते , शेअर बाजरावर त्याचे विपरीत परिणाम होतात व रुपयाचे अवमुल्यन होते. थोडक्यात डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण होते. 
९ तारखेला  बाजार उघडला तेंव्हा रुपयाचा दर प्रत्येक डॉलरमागे 77 रुपये 58 पैसे झाला. आजवरचा हा नीचांक आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने म्हणजे त्यांच्या रिझर्व्ह बँकेने व्याजदर अर्धा टक्क्याने वाढवला आणि डॉलरची किंमत जगातल्या सगळ्याच चलनांच्या तुलनेत वधारली. 
भारताप्रमाणेच टर्की, दक्षिण आफ्रिका यांचीही चलनं गडगडली. भारताच्या तुलनेत त्यांची अर्थव्यवस्था डळमळीत आहे .  पण भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेला सुरुंग का लागावा ? 
कारण भारत सरकारने  असंख्य उद्योगपतींची कर्जे माफ केली  किंवा ति बँकेच्या एनपीए यादीतून काढून टाकली परिणामी  बँकांचे नुकसान झाले . आणि त्याची भरपाई करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी अलिकडच्या काळात सरकारने वापरला  ? 
मुळात 
रुपयाची किंमत बाजारपेठ ठरवते. बाजारातल्या चढ-उतारांवर रुपयाची डॉलरच्या आणि इतर चलनांच्या तुलनेतली किंमत वर-खाली होत असते. याने आपल्याला काय फरक पडतो?
उदा. 
समजा तुम्हाला अमेरिकेतून एक वस्तू विकत घ्यायची आहे, जिची किंमत एक डॉलर आहे व तुमच्याकडे  १२०  रुपये आहेत. डॉलरची किंमत ७८ रुपये असेल तर तुमच्याकडे ४२  रुपये उरतील. पण ती जर डॉलरची किंमत  असती, समजा ६५  रुपये असती तर तुमच्याकडे  ५५ रुपये उरले असते आणि त्यात तुम्ही आणखी काहीतरी विकत घेऊ शकला असतात. आता भारत जेव्हा अमेरिकेतून गोष्टी आयात करेल तेव्हा हेच होईल. आधी करत होतो त्याच आणि तितक्याच वस्तू आयात करण्यासाठी जास्त खर्च येईल.

अर्थविषयक घडामोडींबद्दल  अभ्यास असणारे  अर्थ तज्ज्ञ म्हणतात  "डॉलर महागला की पहिला परिणाम कच्च्या तेलावर होतो. आत्ता आधीच खनिज तेलाच्या किंमती जास्त आहेत, 
त्यात डॉलरही महागलातर  याचा परिणाम आपल्या बॅलन्स ऑफ ट्रेडवर होऊ शकतो आणि करंट अकाउंट डेफिसिट वाढू शकतं. हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही."

"आपण कच्च्या तेलाची आयात डॉलर मोजून  करतो,  जर  आपण कच्चे तेल  रुपयांमध्ये ते विकत घेत असतो तर थोडाफार दिलासा मिळू शकला असता, पण तशी परिस्थिती  नाही.  डॉलर वधारल्याने व सहाजिकच  महागाई वाढल्यामुळे व्यवसायासाठी आयात करणारेही  कचरत आहेत, कारण महाग वस्तू इथे खपवणे कठीण आहे .  या सगळ्याचा थेट ताण आपल्या अर्थव्यवस्थेवर पडतो."
पंतप्रधान मोदींवर या सगळ्यामुळे जोरदार टीका होतेय.  कारण त्यांनी अर्थव्यस्थेकडे गांभीर्याने पाहिलेच नाही .  फुकटच्या योजना ,  सेंट्रल व्हीस्टा सारखे प्रचंड खर्चिक प्रोजेक्ट आणि लाडक्या उद्योगपतींना दिलेले झुकते माफ  याचा परिणाम आपल्या अर्थ व्यवस्थेवर होत आहे . 
रुपयाच्या पडलेल्या किमतीचा भारतीय निर्यातदारांना फायदा होऊ शकेल पण निर्यात वाढीला केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे .  
मागच्या सहा महिन्यांपासून स्टॉक मार्केटमधून विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेतायत. त्यांना परत इथले उद्योधंदे  व शेतातील उत्पन्न  वाढले आणि तरच लोकांची क्रयशक्ती वाढीला लागणार आहे . 
नाहीतर भारतीय रुपयांचे कितीही अवमुल्यन झाले तरीदेखील विदेशी गुंतवणूक फार होईल असे वाटत नाही .  
आधीच महागाईने लोकांचं कंबरडं मोडलंय. घरगुती गॅसच्या किंमती वारंवार वाढत आहेत.  डिझेलने लोकांना शॉक दिलाय, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तू घेणे कठीण झालंय,  कर्जाचे हफ्ते असं सगळं महागत चाललंय पण मोदी सरकार याबद्दल काहीही उपाययोजना  करत नाही  अशी परिस्थिती आहे व विरोधी पक्ष सुद्धा विशेष काही करत नाही . 
डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात जेंव्हा रुपयाची किंमत किरकोळ जरी  घसरत होती तेंव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी युपीए सरकारवर जोरदार टीका केली होती. 'इतर देशांची चलनं घसरत नाहीत मग रुपयाच का घसरतो?', असं मोदींनी या भाषणात म्हटलं होतं. मोदींच्या भाषणातला तोच भाग आता सामान्य नागरिक दाखवत आहेत पण  विरोधी पक्ष पाहिजे तेवढा हल्ला सरकारवर करत नाहीत   फक्त सोशल मिडियात  विचारलं जातंय की मोदी गप्प का आहेत?
युपीए सरकारच्याच काळात लोकसभेत विरोधी पक्ष नेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांनीही रुपयाच्या घसरणीवरून सरकारवर घणाघाती हल्ले  केले होते तेंव्हा  पंतप्रधानांनी उत्तर द्यावं अशीही त्यांनी मागणी केली होती. तो व्हीडिओदेखिल अनेकांनी आता शेअर केला आहे.फक्त पंतप्रधान मोदींनाच नाही, तर सर्व स्तरातील भाजप नेत्यांना विरोधकांनी याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे .  
भारत खुल्या अर्थव्यवस्थेचा भाग  असल्याने कोणत्याच सरकारचं अर्थव्यवस्थेच्या सगळ्या पैलूंवर थेट नियंत्रण नसतं. पण सरकार त्यावर निश्चितपणे उपाययोजना करुन लोकांना दिलासा देऊ शकते . जी 
 बाजारावर  अनेक गोष्टींच  नियंत्रण  असते. जेव्हा परिस्थिती गंभीर होते तेव्हा नियामक यंत्रणा त्यात हस्तक्षेप करत असतात. पण बाजारपेठेची या हस्तक्षेपावर काय प्रतिक्रिया असेल हे त्या त्या वेळीच समजतं. सध्याच्या घडीला तरी रिझर्व्ह बँक यात हस्तक्षेप करेल असं चित्र दिसत नाही . 

विजय पिसाळ नातेपुते



सोमवार, २ मे, २०२२

सव्वीस वर्षांनी एकत्र येत मैत्रिणी रमल्या जुन्या आठवणीत








चालू घडामोडींचे विश्लेषण. . . . . 

सव्वीस वर्षांनी  जीवलग मैत्रिणी रमल्या जुन्या आठवणीत. . 

शाळेतील दिवस होते आनंदाचे ! 
जीवन किती सुंदर ते बालपणीचे ! 
हसने ,  बागडणे , मनमुराद नित्याचे ! 
दंगामस्ती ,  कलकलाट  जणू थवे पाखरांचे ! 
 संस्कार  मनावर रुजले , उपकार त्या गुरुजनांचे ! 

सातारा शहरातील नावाजलेली . 
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची. 
कन्याशाळा, सातारा . 
 या मुलींच्या शाळेतील 
सन १९९५/९६   इयत्ता १० वी या बॅच मधील  विद्यार्थींनीचा स्नेहमेळावा दिनांक १ मे २०२२ रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या शाळेची स्थापना सन १९२२ सालची असून या शाळेचे सन २०२१/२०२२ हे शताब्दी वर्ष सुरू आहे . 
या शाळेत शिकलेल्या  असंख्य मुलींनी , सामाजिक, राजकीय, सहकार,  शिक्षण व क्रिडा आणि आपआपल्या  क्षेत्रात   मोठे नाव कमावलेले आहे.  
स्वातंत्र्यपुर्व  काळात स्त्रियांच्या  शिक्षणाला  पुरुष प्रधान मानसिकतेमुळे विरोध होता अशा काळात मुलींनाही शिक्षण  घेता आले पाहिजे हाच विचार मनात ठेवून या शाळेची स्थापना महर्षी कर्वे  यांनी केली व समाजात पुरुषांच्या बरोबरीने मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले .
या संस्थेची स्थापना  महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यातील हिंगणे या गावी केली होती व संस्थेचे नाव सुद्धा हिंगणे शिक्षण संस्था असे होते .
  या संस्थेने विविध ठिकाणी शाळा व महाविद्यालये काढलेली आहेत. 
हिंगणे संस्थेचे नंतर नामांतर  महर्षी कर्वे असे करण्यात आले .  अशा शिक्षणाचा वारसा लाभलेल्या संस्थेत  १९९५/ ९६  साली इयत्ता १० वी  पुर्ण केलेल्या मुलींचा स्नेहमेळावा संपन्न झाला ,  
दिनांक १ मे रोजी सकाळी  ११ वाजता होणार्‍या स्नेहमेळाव्यासाठी ,  सर्व मैत्रिणी कन्या शाळेत  एकत्र येण्यासाठी आपआपल्या घरून  निघाल्या , कित्येक  मैत्रिणींनी तर खूप लांबचा प्रवास केला आणि या  स्नेहमेळाव्याला उपस्थित राहिल्या  .  १ मे हा दिवस  महाराष्ट्र दीन   व कामगार दीन असतो,
 त्याच बरोबर महाराष्ट्रातील बहुसंख्य शाळांचा  वार्षिक निकाल व गुणपत्रिका वाटपाचाही कार्यक्रम असतो , हा सुवर्ण योग साधून स्नेहमेळावा  १ मे रोजी घेण्याचे निश्चित केले .  

१ मे असल्यामुळे  वातावरण अगदी प्रसन्न होते.    निकालपत्र घेऊन जाण्यासाठी पालकांची व विद्यार्थीनींची गडबड  सुरू होते ,  बहुसंख्य शिक्षकवर्ग  , विद्यार्थी व पालक हे निकालपत्र घेऊन जाण्यासाठी  उपस्थित होते.  
शाळेतील हे आनंदी वातवावरण कित्येक वर्षांनी पहाण्याचा योग आला  . 
  सर्व मुलींनी  आपआपल्या धावपळीच्या जीवतानील  अमूल्य असा वेळ काढून  १ मे च्या   स्नेहमेळाव्यासाठी जणू आपला दिवस राखून ठेवलाय . . आणि नटून थटून आनंदी वातावरणात  स्नेहमेळाव्यासाठी मैत्रिणी जमू लागल्या आहेत हे दृश्य  खूप छान वाटत होते . . 
एक एक मैत्रिणी जमतील तसे  वातावरण खूपच भाऊक होत होते .  सव्वीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर एकत्र  येत असल्यामुळे  सगळ्या मैत्रिणी एकमेकींची गळाभेट घेत होत्या , काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रू आपोआपच येत होते .  आपला वर्ग, आपले वर्ग शिक्षक,  आपले विषय शिक्षक,   शाळेत चालणारे उपक्रम, या आठवणी एकमेकींना सांगताना जनू सगळ्या मैत्रिणीं शालेय जीवनातील भूतकाळात  रमून गेल्या .   पाखरांचा थवा झपकन पिकांवर बसावा तो क्षण आपल्या डोळ्यांनी टिपावा  आणि मन प्रसन्न व्हावे तसे वातावरण पहायला मिळाले . . 
तुझ्या डब्यात किती छान भाजी असायची ,  तुझ्या आईच्या हातचा चिवडा किती मस्त लागायचा , तुझ्या डब्यात तर  काय काय असायचे ,  आपण कसे एकमेकींसोबत डबे खायचो,  हे सर किती छान शिकवायचे , त्या मॅडम किती कडक होत्या ,  तिचे बाबा  किती छान होते ,  चित्रकलेच्या तासाला किती मज्जा यायची ,  आपला वर्ग कसा दंगा करायचा मग आपले सर कसे रागवायचे ही चर्चा  एकदम भुतकाळात घेऊन जात होती ,  शाळेची घंटा वाजावी आणि सर वर्गाच्या बाहेर पडावेत आणि जोरदार हास्य फुलावे तसे आज सर्व मुलींना वाटत होते ,  काहीतरी सांगायचे , भरभरून बोलायचे ही धडपड  सुरु होती ,  प्रत्येकीला वाटायचे किती बोलू आणि काय काय सांगू ,  प्रत्येकीने भूतकाळात जावे आणि आपले अनुभव कथन करावे  आणि सर्वांच्या चेहऱ्यावर कधी हास्य, कधी भाष्य तर कधी , तर कधी कुतुहल फुलावे व  मनमुराद दाद हे आपोआपच व्हायचे ! 
तुझ्यात खूप बदल झालाय। तू आहे तशीच आहे ,  तू जरा स्वतःकडे लक्ष दे ही टिपकल चर्चा मस्त वाटायची क्षणभर  काळजीचे , क्षणभर   आपुलकीचे बोलणे मनापासून आवडत होते .   भूतकाळातील आठवणींचे  क्षण जसे जसे आठवतील तसे  प्रत्येकीचे  मन भरुन यायचे . 
ही  गप्पांची मैफल रंगत असतानाच या मुलींसाठी शाळेने खास नाष्ट्याची व्यवस्था केली होती ,  चविष्ट व रुचकर उडीद वडा आणि इडली सांभर  खावून सर्व मैत्रिणी सुखावल्या . .  अगदी तृप्त झाल्या . . 
तोपर्यंत शाळेतील निकालपत्रांचे वाटप होऊन झाले आणि सगळे शिक्षक व शिक्षिका या स्नेहमेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या  . 
ओ सर, ओ मॅड ओळखले का मला !  
 छान संवाद विद्यार्थीनी व शिक्षक शिक्षिका यांचे होत होते .  थोर ति गुरु शिष्य परंपरा अनुभवता आली .
 भेटीगाठी झाल्या , खुशाली विचारपूस झाली ,  शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थीनी या सर्वांनी   महर्षी कर्वेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .  कृतज्ञतेची भावना जणू  मनात दाटून आली . 
शाळेच्या प्राचार्या श्रीमती  जगताप  मॅडम यांनी शाळेच्या प्रगती बद्दल आणि शताब्दी महोत्सवाबद्दल संपुर्ण  माहिती दिली .  
सर्व मुलींनी आपल्या गुरुजनांनसोबत फोटो काढले , उपस्थित सर्व गुरुजनांनी मुलींची आस्थेवाईकपणे चौकशी केली .   
या प्रसंगी . प्राचार्या श्रीमती कविता जगताप मॅडम,उपप्राचार्य श्री.  चंद्रकांत  ढाणे सर, पर्यवेक्षक श्री.  डी. जी.पवार सर,पर्यवेक्षक श्री एकल सर,चित्रकला शिक्षक श्री  पाडळे सर व याच बॅचच्या परंतु सध्या याच शाळेत कार्यरत असलेल्या सौ. ज्योती बगाडे मॅडम व इतर कर्मचारी  उपस्थित होते. 
यानंतर सौ. स्फूर्ती जाधव (पिसाळ ) हिचे मिस्टर श्री  विजय पिसाळ नातेपुते यांनी मुलींना मैत्रीवर  छोटेखानी मार्गदर्शन  केले  , मैत्री  का केली पाहिजे , मैत्रीची व्याख्या काय?  मैत्री मुळे आनंदी कसे राहता येते , मैत्रीत सुख दुःख कशी वाटून घेतली पाहिजेत   हे ही  सांगितले . सर्व मुलींनी या छोटेखानी भाषणाला मनमुराद दाद दिली . 
श्री विजय पिसाळ यांनी समयोचित एक कविता तयार करून मुलींच्या चेहऱ्यावर  आनंद निर्माण केला .  सदर कवितेची  शब्दरचना . . 
किती गोड तुम्ही आणि तुमची कन्या शाळा ! 
एकमेकींना तुम्ही लावता खूप  लळा ! 
विसरता येणार नाही ना ,  वही , पुस्तक आणि फळा ! 
जाग्या झाल्या आठवणी जुन्या  आणि फुलला ना आनंदाचा मळा ! 
तुमच्या चेहऱ्यावर असेच राहूद्या हास्य,  कायम राहू द्या असाच लळा ! 
वरील छोटेखानी भाषणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्तावना 
 सौ. सुनिता शिंदे(शिर्के ) यांनी केली .  
सदर कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलींनी ,  संपूर्ण शाळेतील जुन्या आठवणी जाग्या करत शाळेत फेरफटका मारला ,  नंतर सगळ्या सख्या मैत्रिणींनी  अंगत पंगत गोल  एकत्र बसून,  आम्रखंड, पुरी, पनीर मिक्स  भाजी  ,   भजी  , पापड, मसालेभात, चटणी , अशा सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.   जेवण करत करत खूप हास्यविनोद करत करत छानपैकी एकमेकींना  आग्रहाने जेवण  करायला  लावले . 
जेवणानंतर सर्व मुलींनी  छानपैकी गप्पा मारल्या आणि वर्गमैत्रिण सौ. मंगल झंवर (राठी) हिने बनवलेल्या थंडगार  फ्रूट सॅलेडचाही मनमुराद आस्वाद घेतला . .  
यानंतर  ,  सर्व मैत्रिणींनी  हातावर सुंदर अशी मेहंदी काढली व त्याचे फोटोही  काढले. 
सगळ्या सख्या मैत्रिणींना इतका आनंद झाला होता हे शब्दात सांगणे कठीणच,   सगळ्या मैत्रिणींचा वावर खूप ताणतणाव विरहित होता . त्यांना मनापासून खूप आनंद झाला होता . म्हणून 
 खूप दंगामस्ती चालू होती .  सर्व मैत्रिणींच्या आग्रहाखातर 
 मैत्रीण कु.  शितल लांडगे हिने "मला जावू द्या ना घरी " ही लावणी अतिशय छान  सादर केली .  शितल लांडगे हीचे खूप मोठे कार्यक्रम होतात.   अशा गोड स्नेहमेळाव्याच्या  कार्यक्रात  सगळ्या मैत्रिणी भावूक झाल्या होत्या ,  खूप मैत्रिणी वेगवेगळ्या क्षेत्रात नावाजलेल्या आहेत. 
कार्यक्रम संपला पाहिजे असे कुणालाही वाटत नव्हते पण वेळ आली निरोप घेण्याची , 
 सगळ्यांनी एकमेकींना परत भेटण्याचे ,  सुख दुःखात सहभागी होण्याचे जणूकाही वचन या निमित्ताने दिले .  तसेतर कुणाचेही  पाऊल शाळेतून बाहेर पडत नव्हते  पण सगळ्यांना आपआपल्या घरट्याकडे जावेच लागणारं होते .  जड अंतकरणाने निरोप घ्यायची वेळ येऊच नये असेच प्रत्येकीला वाटत होते . कुणी संसारात तर कुणी आपआपल्या व्यापात 
हरवलेल्या चिमण्या  निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्या .  
. कित्येक वर्षांनी भेटल्याचा आनंद होताच, 
आणि परत भेटण्याची ओढही होती ,  जुन्या आठवणी  जागवून   यापुढेही  आनंदी जीवनाचा प्रवास करत करत पुन्हा पुन्हा एकत्र येण्याचा शब्द देऊन बाय बाय केले  आणि  भावनांचे कंठ दाटले . 
आपोआप  ओलावले नयन, 
किंचित  आश्रूंनी वाट मोकळी केली !
भेटणे व्हावे  निरंतर,  आयुष्य रहावे सुखी  चिरंतन! 
🙏🙏

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  , निर्मला मोहिते , ज्योती बगाडे  यांनी खूप परिश्रम घेतले ,  निर्मला मोहिते हीने सर्वांना एकत्र करण्यासाठी , नंबर व पत्ते शोधण्यासाठी खूप मेहनत घेतली . 
या बद्दल सर्व मुलींच्या वतीने  निर्मला  मोहिते हीचा सत्कार श्री.  विजय पिसाळ यांनी केला तर ज्योती बगाडे हीचा सत्कार  , शिल्पा शिंदे , सुनिता शिंदे व सोनाली शिरसाठ यांनी केला . . 
सदर स्नेहमेळाव्याला. 
ज्योती बगाडे ,  मेघा मोहिते ,  निर्मला मोहिते ,  सोनाली शिरसाठ, स्फूर्ती जाधव, सुनिता शिंदे उर्फ  संध्या  शिर्के ,  रिना चव्हान, मनिषा यादव,  जयश्री पाटूकले , योगिता निकम,  स्मिता उंबरदंड, दिपाली अंबेकर,  मेघा घाडगे ,  पुष्पलता भोसले ,  शितल रजपूत,  मंगल झंवर,  शिल्पा निकम, अनिता पाटील,  मोनाली यादव, लता महाजन, विमल बर्गे ,  जबीन शेख,  निलम निंबाळकर,  गीता ढवळे ,  शितल लांडगे . या मैत्रिणी  उपस्थित होत्या .