vijaypisal49. blogspot. com

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

गावगाडा कसा चालणार?

चालू घडामोडींचे विश्लेषण
*कसा चालणार रुतलेला गावगाडा !*
वारंवारची संकटे झेलून झेलून शेतकरी मेटाकुटीला आलाय, कधी बाजारभावाचा प्रश्न, कधी जास्त उत्पादन झाले तर माल रस्त्यावर फेकण्याची वेळ येते , कधी वादळी वारे पीक भुईसपाट करतात  , कधी गारपीटीने होत्याचे नव्हते होते , कधी महापूरात सर्वस्व संपून जाते , कधी ओल्या  दुष्काळात पीक सडून जाते , तर कधी कोरड्या  दुष्काळात पीकांची होरपळ होते   तर कधी परदेशातून आयात केलेल्या मालामुळे दर पाडले जातात,  पाडलेले   गेलेले बाजारभाव अशी  नैसर्गिक व सरकार निर्मित  शेतकरी संकटे झेलून झेलून तो थकलाय,   त्याची लुट करून करून सगळे मजेत आहेत, लुट करणारांना , त्याचे शोषण करणारांना ,  त्याला आत्महत्या करायला भाग पाडणारांना कोणीही शाप देत नाही , त्याच्या टाळूवरील लोणी खाणारांना कोणताही देव शिक्षा देत नाही .  त्याची सर्रासपणे लुट केली तरीदेखील आजवर ना कोणत्या सरकारला , ना कोणत्या सावकाराला ना फुकट खाणारांना पाप लागले आहे . त्याला षडयंत्र रचून रचून घायला आणायचे काम करायचे , सगळ्यांना पोसण्यासाठी पिळवणूक करायची . आणि त्याचाच नावाने राजकारण करून मगरीचे आसू ढाळायचे .   आतातर  त्याच्यातील काहींना ६००० हजारांचा नको असलेला उतारा टाकलाय?  जणू भीक टाकावी व त्याने पोट भरावे तसे !  या कोरोनाच्या संकटात तो पुरता संपलाय. .  त्यासाठी राजकारण म्हणून सुद्धा कुणी पुढे आले नाही . 
 पोटच्या पोरापेक्षा जास्त जपलेल्या , फळबागा , भाजीपाला , शेतात सडून गेला , जागेवर माल पीकून खराब झाला !  कित्येक माझ्या बांधवांना तो  विकताच आला नाही . खूप महत प्रयासाने  विकायची परवानगी भेटली तर वाहतूकीची साधने नाहीत. शेतमालाची ने आण करायला परवानगी , डिझेल टाकायला पास  , 
शेतातील तयार झालेली फळे पिकवण्याची त्याच्याकडे यंत्रणाच नाही ?  आणि तो माल   पिकवला तर माल विकत बसायचे की, शेतात कधी  राबायचे ?  शेती कधी  करायची ?   बाहेर माल विकायला जावे म्हटलं तर शेतातील गुरे , जनावरे बघायची कोणी ?  त्यातूनही सवड काढली तर  बाहेरगावी जाता येत नाही .   व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेतात व अशाही संकटात  लोकांना मात्र अव्वाच्या सव्वा दराने विकतात.  नुसती ग्राहक व शेतकर्यांची लुट चालू आहे .  यावर सत्ताधारी व विरोधक मुग गिळून गप्प आहेत .  लाखो रूपये शेतकर्यांनी फळ बागांसाठी,  भाजीपाल्यासाठी घातले . आता त्यातील १० ते २०% तरी वसूल होतील का नाही शंका आहे  ? सरकारी मलपट्टी होईल, मदतीचे आकडे जाहीर होतील पण शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार घंटा ?  फॉर्म भरणारे , फॉर्म जमा करून घेणारे , याद्या तयार करणारे मात्र मालामाल होणार? 
 मदत मिळेत ति पण ठरावीक लोकांनाच मात्र जाहिरातींची पाने भरभरून छापून येतील हे मात्र नक्की . या महामारीत 
  प्रचंड नुकसानीमुळे   कित्येक शेतकऱ्यांचे  कर्ज थकणार, यात जवळपास ८० % शेतकऱ्यांचे सीबील खराब होणार, त्यामुळे थकीत गेलेल्या शेतकर्यांना  बँका पुढील हंगामात  पतपुरवठा करतील का नाही . ही शंका आहेच  . खाजगी सावकार लुटणार हेही नक्की आहे . सामान्य शेतकऱ्यांनीच नव्हे तर मोठ मोठ्या शेतकऱ्यांनीही  मशागत, मजूर,  खते , बियाणे, डिझेल, पेट्रोल  यासाठी पैसा कसा व कुठून उपलब्ध करायचा हा गंभीर प्रश्न आहे .  शेतकर्यांना  या लॉकडाऊनमध्ये ना पोलिसांनी समजून घेतले , ना महसूल विभागाने समजून घेतले . शेतकऱ्यांचा  किरकोळ माल विकतानाही नाकीनऊ आणले . तेल मिठ सुद्धा बंद पाडले , शेतकरी  लोकांना डिझेल, पेट्रोल यासाठी वनवन करावी लागली , गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना काठीचा प्रसाद खावा लागला . सातत्याने अडवणूक झाली .  त्यामुळे  शेतातील असंख्य कामे पेंडींग राहिली आहेत. मजूरांना शेतात जाताना येताना  भयंकर त्रास सहन करावा लागला , कसा हा तोटा भरून काढायचा  , उपसलेल्या बँका कशा भरायच्या ? 
 पुढच्या काळात   शेती जर पिकली नाही तर हे लोक काय खाणार आहेत कुणास ठावूक. .  प्रशासनाने शिस्त लावायची असते नियम घालून द्यायचे असतात,  पुढाकार घ्यायचा असतो . उपाय योजना करताना गोरगरीबांचे  कमीतकमी नुकसान कसे होईल हे पहायचे असते ?   पण इथे मात्र लोकांना हुसकावून लावणे , मारहाण करणे अपमानास्पद बोलणे सर्रासपणे चालूच होते. किराणा दुकाने बँकात सोशल डिस्टन्सिंगचे किती काटेकोरपणे पालन झाले ?  पण मोटार सायकलवरून फिरून भाजी विकणारांना मात्र हुसकावून लावले गेले , भाजी विकायला चालला तरीदेखील, लायसन्स मागीतले गेले !   ज्या हाताने माणसे पोटभर खातात ते तर शेतातून आलेले असते व त्याच शेतकऱ्यांना   मारहाण केली जाते ?  किती दुर्दैवी आहे .  सगळ्या जगात  जागोजागी मि पोलिस मित्र पाहतोय , प्राणीमित्र, पक्षीमित्र, पाहतोय, पण एकही शेतकरी मित्र पाहिला नाही , जो शेतमाल विकायला मदत करेल!  जो तो फुकट लुटायला , फुकट मिळवायला बसलेला मि पाहिला ! 
 ज्यांना काहीतरी आमचे दुःख समजेल? असे दिसलेच नाहीत! 
या मानवतेच्या ढोंगीपणात  शेतकर्यांच्या व्यथा मांडायला यंत्रणा मुकी झालीय,  शेतकर्यांच्या व्यथा एेकायला यंत्रणा बहिरी झालीय.  शेतकर्यांचा माल फेकून देत असताना सगळी यंत्रणा आंधळी झालीय.   सगळे  ड्रामेबाज कार्यक्रम व त्याचे काय ते कौतुक?   मेडिकल, बँका , किराणा दुकाने या ठिकाणी  किती सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले ?  मुळात भाजीपाला फळे जेवढे नियम पाळून विकली तेवढे बाकी काहीच विकले गेले नाही . कितीजण हँडवॉश व सॅनेटा़ईझरचा वापर करतात?  पण शेतमाल विकताना मात्र यांना नियम दिसतात. नियम पाहिजेत पण सर्वांसाठी सारखेच असावेत ना ? 
  बळीराजाच्या मृत्यू नंतर   शेतकऱ्यांना कुणीच वाली राहिला नाही . 
येणारा काळ भयंकर असेल हे मात्र नक्की !  
विजय पिसाळ नातेपुते.